Marathi e-Batmya

नितीन गडकरी यांनी सांगितला किस्सा, चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये…

मागील काही दिवसांमध्ये दिल्लीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पध्दतशीर पंख छाटण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच आता महाराष्ट्रातून गडकरी यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या अनुषंगाने एक किस्सा सांगत व्यासंगी राजकारणी श्रीकांत जिचकर यांच्या सल्ल्यानंतर काय म्हणाले होते याचे विस्तृत माहितीच त्यांनी यावेळी दिली.

उद्योजकांशी संवाद साधताना गडकरी यांनी रिचर्ड निक्सनचे उदाहारण दिले, एखादी व्यक्ती तेव्हा संपत नाही जेव्हा तो हारतो. व्यक्ती तेव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणे सोडून देतो. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीही सोडू नका. व्यवसाय, समाजसेवा आणि राजकारण या क्षेत्रात जनसंपर्क हीच त्या व्यक्तीची खरी ताकद असते. त्यामुळे जनसंपर्क कसा वाढता राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

जे ही कोणी व्यवसायात आहेत, सामाजिक कार्यात आहेत किंवा राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वात मोठी ताकद आहे. एखाद्याचे चांगले दिवस असो वा वाईट दिवस असो, जर तुम्ही कुणाचा हात हातात घेतला असेल म्हणजेच त्या माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका, असा सल्लाही त्यांनी उपस्थित उद्योजकांना दिला.

नितीन गडकरी यांनी आपला जुना एक किस्सा देखील सांगितला. गडकरी म्हणाले, जेव्हा मी विद्यार्थी नेता होतो, तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी मला चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की मी एकवेळी विहीरीत उडी मारेल पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही.

Exit mobile version