Marathi e-Batmya

जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे वक्तव्य करताच कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमातच नकारघंटा

मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरून चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय झालेला असल्याने ७ वर्षे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे वक्तव्य केले.

या वक्तव्यावरून जयंत पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी नाही नाही अशी ओरड करण्यास  सुरुवात केली. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा आहे. तरीही त्यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर मागील ७ वर्षापासून प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली. त्यामुळे आता पक्षात नव्या रक्ताला संधी देण्यासाठी मी या पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, या राज्याच्या जडणघडणीतले अनेक निर्णय सत्तेत असताना या पक्षातल्या सगळ्या धोरणांना घेण्याचं काम केले. या १४ वर्षाच्या कालखंडात १५ वर्षाच्या कालखंडात पक्षही अतिशय सामर्थ्याने वाढवण्याचे काम झाले. पण २०१४ साल उजाडले भाजपाची सत्ता आली आणि बरीच लोकं आमच्या रेल्वेतून उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायला लागेल. पण आपण सगळे पवार साहेबांच्या मागे निष्ठेने राहीलो. तुमचे कौतुक मला यासाठीच आहे की अनुकूल असो प्रतिकूल असो, यश मिळो अथवा न मिळो तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना आयुष्यभर साथ दिली आणि म्हणून संख्ये पेक्षा गुणवत्तेला महत्व असल्याचेही यावेळी सांगितले.

जयंत पाटील बोलताना म्हणाले की, सुप्रियाताईंनी (सुप्रिया सुळे) आॕपरेशन सिंदूर बद्दल भूमिका मांडली. आपले पक्षीय मतभेद असतील मात्र परराष्ट्र धोरणाचा प्रश्न येतो तेव्हा या देशाच्या संरक्षणाची भूमिका पुढे मांडावी लागते. त्या ठिकाणी आपल्या पक्षाने आणि आदरणीय पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितलेले आहे की, देश हिताची भूमिका ही सर्वप्रथम घेतली पाहिजे. शत्रूला धडा शिकवण्याची वेळ येते, त्यावेळी देश एकसंघ असला पाहिजे असेही म्हणाले.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार दौरा केला. यावेळी ११ कोटी जनतेला वाटत होते की आता मविआचा विजय होणार, पण निकाल थोडा वेगळा लागला. निवडणुकीची प्रक्रिया संशयास्पद होती. अलीकडच्या काळात निवडणूक आयोगाच्या कामाकाजाबद्दल देशाच्या विरोधी पक्षनेत्यांनी एक पत्र लिहले आणि त्यांचा खुलासा मागितला, पण निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही, आणि इतर लोकं त्यावर बोलत आहे. निवडणूक आयोगाला त्यावर बोलू दिले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत ८५ मतदार संघात महायुती हरली, तिथे निकाल वेगळे लागले. उत्तम जानकर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी केलीहोती मात्र त्यांच्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अस बोलल गेलं. ८ बहाद्दर निवडून आले ९ आले असते मात्र ट्राम्पेटमुळे एक जागा गेल्याची भावनाही यावेळी व्यक्त केली.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, काही ठिकाणी चिन्हाचा फटका बसला. निवडणुकीत मनी अन मसलचा वापर झाला हे वेगळ सांगायला नको. ओबीसी OBC आरक्षण मुद्द्यावरून पवार साहेबांवर नाहक टीका केली जाते. ओबीसी obc हितासाठी शरद पवारांनी नेहमी प्रयत्न केले. देशात मंडल लागू करणारा पहिले मुख्यमंत्री पवार साहेब होते. आम्ही तुकाराम महाराज यांच्या विचारांचे आहोत. तुकाराम महाराज यांनी सांगितले की, भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी, यामुळे या पुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे. ही लढाई तुकाराम vs नथुराम आहे. पुढे रस्त्यावर उतरणार आहोत. पराभवाची चर्चा करू नका, असे आवाहनही यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे पक्ष कार्यालय येथे ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्षा व महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा व राज्यसभा खासदार फौजिया खान, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख, राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार, पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख व सेवादलचे प्रदेशाध्यक्ष गिरीश सावंत यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version