नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये व शासनाने त्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
यावेळी सभागृहात बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी, चंदवाडी येथील शेतकर्यांनी ६.५ किलोमीटर अंतरावरून वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी २.५ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यासाठी ४० हॉर्सपॉवरच्या दोन मोटारी बसविलेल्या आहेत. सद्यस्थितीत पारंपरिक पद्धतीने शेती पंप वीज कनेक्शन देणे सरकारने बंद केले आहे. तसेच सरकारने मागेल त्याला सौरपंप योजनेअंतर्गत शेतीसाठी पाणी उपसा करणेकामी १० हॉर्सपॉवर पर्यंत सौरपंप बसविण्याची योजना सध्या सुरु आहे. परंतु सौरऊर्जेवरील पंप बसवून शेतीसाठी पाणी उपसा करणे शक्य नाही. ६.५ कि.मी. वरुन पाणी वाहून नेणे शक्य नाही. तसेच सौरऊर्जा प्रकल्प वारणा नदीकाठी जागेच्या अभावी बसविणे शक्य नाही. पुरामुळे नदीकाठी बसविलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांची शाश्वती नाही ते डॅमेज होऊ शकतात. वाळवा तालुक्यातील हे फक्त एक उदाहरण आहे. असे नदीच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपंप शेतीसाठी वीजकनेक्शन तात्काळ मिळावे यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
