Marathi e-Batmya

जितेंद्र आव्हाडांचा आरोप,…लोकांच्या पैशातून भाजपा आणि मोदींचा निवडणूक प्रचार

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोठमोठ्या घोषणा करत भाजपाला तिसऱ्यांदा संधी देण्याची मागणी भाजपा कार्यकर्त्यांसमोर करत देशाच्या विकासासाठी, गरिब जनतेला मोफत अन्न मिळण्यासाठी आणि देशाला पहिल्या तीन विकसित राष्ट्राच्या यादीत बसविण्यासाठी भाजपाला तिसऱ्यांदा संधी हवी असल्याची मागणी केली. तसेच यावेळी एकट्या भाजपाला ३७० जागा मिळवाव्याच लागतील असेही स्पष्ट केले. देशातील जनतेपर्यंत मोदी सरकारच्या योजना पोहोचविण्यासाठी गरिब कल्याण अन्न योजनेच्या प्रत्येक बँगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मराठी ई-बातम्याच्या संकेतस्थळावर इंग्रजी संकेतस्थळाच्या सहाय्याने प्रकाशित करण्यात आली होती.

यासंदर्भात एकट्या राजस्थानमधील भाजपा सरकारकडून भारतीय खाद्य निगम अर्थात फूड कार्पोरेशनच्या बॅगांवर १३ कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आरटीआयमधून आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्या आरटीआयमधील ट्विटचा आधारे नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकास्त्र सोडले.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया – जयपूर, राजस्थानकडून मिळालेल्या ‘आरटीआय’च्या माहितीमध्ये केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत रेशनच्या वितरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेल्या पिशव्यांवर १३,२९,७१,४५४ रुपये (१,०७,४५,१६८ पिशव्या x १२.३७५ रुपये) खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. हे आकडे फक्त राजस्थान या एका राज्याचे आहेत. भारतातील एकूण २८ राज्ये ८ केंद्रशासित प्रदेशांचा विचार केल्यास हा मोदींची प्रतिमा असलेल्या पिशव्यांवरील खर्च किती कोटींच्या घरात जाईल याची कल्पना करा असे आवाहनही केले.

हे ही वाचाः-

कोरोनानंतर आता पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेच्या बँगवर मोदींचा फोटो

तसेच पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुळात मोदींची प्रतिमा असलेल्या पिशव्या हव्यात कशाला? एकीकडे गरीब कल्याण म्हणायचं आणि दुसरीकडे अनावश्यक वाढीव खर्च करायचा. हाच पैसा अधिक धान्य किंवा आणखी काही लोकांना धान्य देण्यासाठी वापरता आला असता असे सांगत लोकांच्या मेहनतीच्या पैशावर खुलेआम डल्ला मारला जातोय आणि भ्रष्टाचाराच्या नावाने गळे काढणारा भाजपा सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवताना लोकांच्याच पैशांनी स्वत:चा निवडणूक प्रचार करून घेत आहे अशी खोचक टीकाही केली.

Exit mobile version