Marathi e-Batmya

जेएनयुसारखे हल्ले महाराष्ट्रात सहन करणार नाही

मुंबईः प्रतिनिधी
नवी दिल्लीतील जेएनयु विद्यापाठीतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या बुरखाधारी हल्लेखोरांचे चेहरे समोर आले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करत ते डरपोक असून त्यांच्यात हिंमत नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत अशा प्रकारचे हल्ले महाराष्ट्र कदापीही सहन करणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला. मातोश्री या आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तसेच जेएनयुतील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनाचे त्यांनी एकप्रकारे समर्थनही केले.
युवक हे आपले उद्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांची विचारधारा ही महत्त्वाची आहे. युवक आपल्या वसतिगृहात सुरक्षित नसतील हे देशाला कलंक असल्यासारखे आहे. सर्व युवक हे महाराष्ट्रात सुरक्षित आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही जर काही झाले तर आम्ही माफ करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
डरपोकांचे समर्थक हिंदुस्थानात नसतात अशी टीका करत हल्लेखोर देशासमोर यावेत. यात मला राजकारण करायचे नाही. निःपक्ष पणाने याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
तरुण हे बॉम्ब सारखे आहेत त्यांना भडकवू नका. तरुणांचा उद्रेक बाहेर येतोय. मी संपूर्णपणे तरुणांच्या सोबत असून त्यांनी घाबरायचे कारण नाही. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नसल्याचे आश्वासन त्यांनी राज्यातील युवकांना दिले.
काही जण भातुकलीचा खेळ खेळत आहेत. त्यांना खेळू दे असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना लगावला.

Exit mobile version