राज्यात संशयातीत बहुमत मिळवित भाजपा आणि महायुती आता सत्तेत विराजमान होणार आहे. सध्या त्या तयारीत महायुतीतील पक्ष आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाजपाकडून कमालीची गुप्तता राखण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाकडून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर विविध पर्यायांची चाचपणी करत आहे. त्यातच विधानसभा निवडणूकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज एक बैठक झाली. या बैठकीत भाकरी फिरविण्यात चर्चा करण्यात आल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी रोहित पवार यांना भाकरी फिरविण्याबाबतच्या अंदाजाबाबत विचारले असता म्हणाले की, होय यावेळी पक्ष संघटनेत १०० टक्के भाकरी फिरविण्यात येणार आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत मोठे बदल झाल्याचे पाह्यला मिळतील. पुढील काही दिवसात पक्ष संघटनेत शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून मोठे बदल केल्याचे पाह्यला मिळतील असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार नेहमी म्हणतात की, योग्य वेळी भाकरी फिरवावी. त्यानुसार भाकरी फिरविण्याची योग्य वेळ आली आहे. तसेच शरद पवार आणि जयंत पाटील हे स्वतः त्यात लक्ष घालणार आहेत. पुढच्या काही दिवसात पक्ष संघनेत बदल झालेले तुम्हाला पाह्यला मिळतील. हे बदल झाल्यानंतर ज्याना जबाबदारी दिली जाईल ते ताकदीने येणाऱ्या स्थानिक निवडणूका मनापासून लढतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
त्याचबरोबर रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, पक्षाच्या प्रतोद पदासाठी झालेल्या बैठकीत शरद पवार हे तेथे होते. त्यावेळी मीच सांगितले की मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी रोहित पाटील यांच्यावर सोपवावी, त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असे बोलता येत नाही. येत्या काळात ज्या काही समित्या आहेत त्या समित्यांमध्ये विरोधी पक्ष म्हणून त्यामध्ये कदाचीत माझ्या सारख्याला संधी मिळू शकते. काल जी पदे दिली. ती पदे फार विचार करून देण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.
