Marathi e-Batmya

नवाब मलिकांचे भाजपाला आव्हान, अविश्वास ठराव आणा म्हणजे किती सोबत आहे हे समजेल

मराठी ई-बातम्या टीम

महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार आहे. त्यामुळे हिंमत असेल तर भाजपाने सरकारवर अविश्वास ठराव आणावा म्हणजे त्यांना आधी किती आणि आता किती सोबत आहे हे समजेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाला लगावला.

दरम्यान विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पारदर्शक पध्दतीने होत असेल तर भाजपाने त्याचा स्वीकार करावा असेही नवाब मलिक म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाचे बहुमत आमच्या सरकारकडे आहे. विवेक बुद्धीने मतदान झाले पाहिजे असे भाजपाच बोलत असेल तर संसदेत उघडपणे मतदान केले जाते. मग त्या खासदारांना विवेकबुद्धी नाही का? असा खोचक सवालही त्यांनी केला.

मंत्र्यांना वारंवार येत असलेल्या धमक्या लक्षात घेता आयपीएस अधिकार्‍यांची एक एसआयटी स्थापन करावी – नवाब मलिक 

मंत्र्यांना वारंवार येत असलेल्या धमक्या लक्षात घेता आयपीएस अधिकार्‍यांची एक एसआयटी स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेत केली.

कर्नाटकातून एकाने आदित्य ठाकरे यांना धमकी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत या विषयावर चर्चा झाली. त्यावेळी मलिक यांनी या गंभीर विषयावर बोलताना त्यांनी मागणी केली.

सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणात भाजपच्या नेत्याने ट्वीटरवर ट्रेंड करण्यासाठी ३० लाख रुपये वापरले असा आरोपही करत कलबुर्गी, दाभोळकर, गौरी लंकेश यांच्या हत्येमागे सनातनसारख्या संस्था आहेत. बऱ्याच मंत्र्यांना धमक्या येत आहेत त्याचे कनेक्शन कर्नाटकमध्ये आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.

दरम्यान नवाब मलिक यांनी मागणी केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसआयटी स्थापन करत असल्याचे जाहीर केले.

Exit mobile version