Marathi e-Batmya

न्यायालाच्या निकालाने शहरी नक्षलवादावर शिक्कामोर्तब

मुंबईः प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचन्याप्रकरणी कम्युनिस्ट विचारांच्या चार अभ्यासकांवर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई योग्य ठरत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची नजर कैदेतील अटक आणखी चार आठवड्यांनी वाढविल्याने शहरी नक्षलवादावर एकप्रकारे शिक्कामोर्तब होत असून त्यांना गजाआड जावेच लागणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देशातील वाढता भाजप आणि हिंदूत्वाचा प्रभाव याला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केली. त्यावर समाजाच्या सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन केले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्या चार जणांना तुरुंगात ठेवण्याऐवजी त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पुन्हा सुणावनी झाली असता त्यांच्या नजरकैदेत आणखी चार आठवड्यांची वाढ करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब होत आहे. तसेच शहरी नक्षलवाद असल्याचेही स्पष्ट होत आहे. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका महत्वाची असून कुणाची राजकिय भूमिका काय याला महत्व नाही. तसेच सर्वच राजकिय नेत्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहीजेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
देशाच्या विरोधात षढयंत्र रचणाऱ्यांच्या विरोधात आमच्याकडे पुरावे असल्याने त्या चारही जणांची कस्टडी आम्ही घेवू असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Exit mobile version