Marathi e-Batmya

रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, सरकार ४० नव्हे तर १३ कोटींसाठी चालवायचे असते…

राज्यातील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत विजय मिळविल्यानतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नायगांव येथे क्रांतीज्योतील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास भेट दिली. त्यानंतर सातारा क्लब येथे प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

यावेळी रोहित पवार बोलताना म्हणाले, सरकार म्हणजे काही लोक असत नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्र असतो. कोणतेही सरकार चाळीस लोकांसाठी चालवलं जात नाही तर तेरा कोटी महाराष्ट्रासाठी चालवलं पाहिजे. हे आत्ता सत्तेत असलेल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, राजकीय भूकंप करण्याची क्षमता फक्त जनतेमध्ये आहे. त्यामुळे यापुढे ज्या विधानसभा, लोकसभेच्या व इतर निवडणुका होतील, त्यामध्ये लोकच भूकंप घडवून आणतील. ज्या गोष्टी आज चाललेल्या आहेत त्या लोकांना पटणाऱ्या नाहीत. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि संविधानाचा अवमान राज्य आणि केंद्रातील सरकार करत आहे. ते लोक बघत आहेत आणि त्यांना या गोष्टी आवडणारे नाहीत. त्यामुळे भूकंप झाला तर ज्यांनी भूकंप घडवून आणला, जे लोक महाराष्ट्रात बाहेर जाऊन सत्ता बदल केला, त्यांच्यातील असंतुष्टामुळेच कदाचित भूकंप होऊ शकतो. पण मोठा भूकंप सामान्य लोक करतील असा इशाराही दिला.

पहाटेच्या शपथविधी ही शरद पवारांनी खेळी होती व त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला असे जयंत पाटील म्हणाल्याचे रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले , जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे चांगले काम सुरू आहे. ते जे काही बोलत असतात त्याला अनेक संदर्भ आणि वेगवेगळे अर्थ असतात, आणि पहाटेच्या शपथविधीला काय घडलं, हे शरद पवार आणि अजित पवार यांना माहित आहे. याविषयी ते काही बोलत नाहीत. मात्र यानंतर काय झालं हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं असल्याचेही ते म्हणाले.

राजकीय पतंगबाजी नितेश राणे यांनी करू नये. शक्ती कायद्यावरून त्यांनी नितेश राणेंवर निशाणा साधताना म्हणाले, सरकारला महिलांना ताकद द्यायची नाही. युवकांचे आणि महिलांचे प्रश्न मांडण्याऐवजी व सोडवण्याऐवजी टेबल टेनिस प्रमाणे इकडून तिकडे करायचे आहे. त्यामुळे त्यांनी याविषयी पतंगबाजी करू नये. महाराष्ट्र क्रिकेट मध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंचाही समावेश आहे. महिला क्रिकेटमध्ये ही ग्रामीण भागातील मुली पुढे आहेत.

पार्थ पवार नाराज असून ते राष्ट्रवादी सोडणार असल्याचे पडळकर सांगतात, या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, पार्थ पवार हा माझा भाऊ आहे आणि आम्ही वेळोवेळी चर्चा करत असतो. जे कोण बोलत आहेत त्यांना अजून पवार कळालेले नाहीत. तसेच त्यांना त्यांचाच मतदारसंघ कळलेला नाही. त्यामुळे पवार ही त्यांच्यासाठी फार लांबची गोष्ट आहे. राहिला प्रश्न बारामतीचा त्यासाठी त्यांना बेस्ट ऑफ लक.. कारण लोक निर्णय घेतात, नेते निर्णय घेत नाहीत असा खोचक टोलाही रोहित पवार यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला.

Exit mobile version