Marathi e-Batmya

त्य़ा नेत्यांवरील आरोपांच्या चौकशीचे काय झाले? राष्ट्रवादी जाणार ईडीकडे

मुंबईः प्रतिनिधी
साधारणतः दोन वर्षांपूर्वी त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीत असलेल्या अनेक नेत्यांच्या वर धाडसत्र सुरु झाले होते. मात्र त्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ईडीकडून सुरु झालेला तपास कुठेपर्यत झाला याची माहिती घेवून त्या अनुषंगाने असलेली पक्षाकडे जमा झालेली माहिती देण्यासाठी लवकरच ईडीच्या अधिकाऱ्यांची वेळ घेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी जाहिरपणे, मला रोज रात्री शांत झोप लागते. कसलीही चौकशी नाही, कोणताही तपास नाही. भाजपामध्ये आल्याचा हा एक फायदा असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. याच अनुषंगाने हर्षवर्धन पाटील यांच्यासह राणा जगजितसिंग, बबनराव पाचपुते, नारायण राणे, मधुकर पिचड, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यावेळी भाजपात प्रवेश केला. त्याचबरोबर त्यावेळी या नेत्यांसह अनेकांच्या घरावर ईडीच्या धाडी पडल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे या सर्वांच्या विरोधात ईडीकडे तक्रारीची पुढे काय झाले? याची माहिती घेण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर भाजपात जावून केंद्रात मंत्री झालेल्या काही नेत्यांच्या विरोधातही काही तक्रारी दाखल झालेल्या होत्या. त्या तक्रारींचे पुढे काय झाले? याची विचारणा ईडीकडे करण्यात येणार आहे. याशिवाय ज्यांच्या विरोधात यापूर्वीच ईडीकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यांच्या विरूध्दचे अनेक पुरावे आणि त्या अनुषंगाने असलेली कागदपत्रे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जमा झालेली असून ती कागदपत्रेही ईडीकडे भेटी दरम्यान सुपुर्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात किरीट सोमय्या यांची मदत घेणार का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी नवाब मलिक यांना विचारला असता ते म्हणाले की, ते कोणत्या तरी रद्दीवाल्याच्या दुकानातून कागदपत्रे आणतो. आम्ही मात्र खरी कागदपत्रे ईडीला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version