Marathi e-Batmya

ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही

सातारा-मुंबई: प्रतिनिधी
सांगली लोकसभा निवडणुकीत पराभव व बारामती विधानसभा निवडणुकीत ज्याचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे लोकांनी स्वतःहून त्यांना बाजूला केले असून त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी इतके काही त्यांचे काम नसल्याचे सांगत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नसल्याचे सांगत ते अदखलपात्र असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
सातारा येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज ते साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या भेटीसाठी भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गेले होते. त्यामुळे राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेले शिवेंद्रराजे पवारांच्या भेटीला गेल्याने राजकिय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकच्या अखत्यारीत सहकारी बँकांचे नियंत्रण दिल्याने सहकारी बँका संपवण्याकडेच केंद्र सरकार वाटचाल करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नुकतेच केंद्र सरकारने विशेष अध्यादेश काढत देशातील सर्व सहकारी, अर्बन, मल्टीस्टेट बँका रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत आणले. त्यामुळे त्यांनी वरील आरोप केला.
भारत चीन प्रश्नावर राजकारण करण्याची गरज नाही. गस्त घालताना चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत आल्याचे लक्षात आल्यावर भारतीय सैन्याने त्याचा प्रतिकार केला. गस्त घातली नसती तर हे लक्षातही आले नसते. त्यामुळे सध्या गोळीबार न होता केवळ झटापटी होत आहेत. चीनने कुरापत काढली आहे हे वास्तव आहे. पण भारताने त्याचा योग्य प्रतिकार केल्याचे ते म्हणाले.
ही वेळ राजकारणाची नाही. १९९३ साली देशाचा संरक्षण मंत्री असताना मी चीनचा दौरा केला होता. त्यावेळी काही सीमांवर बंदुकीचा किवा शस्त्राचा वापर करायचा नाही असा करार करण्यासंदर्भात चीनच्या संरक्षण मंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यावर पुढील काळात नरसिंहराव यांनी पुन्हा चीन दौरा करून तो करार अंमलात आणल्याची बाब त्यांनी यावेळी लक्षात आणून दिली.

Exit mobile version