Marathi e-Batmya

ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मागितली मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तीन प्रश्नांची उत्तरे

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालावरून आधीच महाविकास आघाडीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (६ डिसेंबर) रोजी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्र लिहित वंचितने विधानसभा निवडणुकीतील तात्पुरत्या मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तसेच या संदर्भात तीन प्रश्न उपस्थित करत त्याची उत्तरेही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागितली आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, विचारलेल्या ३ प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. ते प्रश्न खालील प्रमाणे…

१. मतदाराला त्याचे/तिचे/त्यांचे मत देण्यासाठी लागणारा वेळ,

२. जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते !संध्याकाळी ६ या वेळेत झालेल्या मतांची नोंद केली आहे का आणि असल्यास, त्याचा तपशील;

३. जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग ऑफिसर यांनी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:५९ वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना जारी केलेल्या टोकनची संख्या नोंदवली आहे का आणि असल्यास, त्याचा तपशील?

प्रकाश आंबेडकर पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि आमच्या चिंतेचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे. कारण ते भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रिया आणि आचरणावरील घसरलेल्या आणि डळमळलेल्या विश्वासाची दखल घेतील असा विश्वास व्यक्त केला.

निवडणूक आयोग यावर काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने आक्रमकपणे ईव्हीएम EVM मशीन मधील घोळ बाहेर काढले आहेत व जनजागृतीसाठी ईव्हीएम EVM हटाव स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे.

Exit mobile version