Marathi e-Batmya

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, भाजपा आता बलात्काऱ्यांना पाठीशी घालणारा पक्ष बनतोय

राज्यात महिलांची सुरक्षितता ही गंभीर चिंतेची बाब बनली असून, सत्ताधाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

आपल्या भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. बदलापूरसारख्या प्रकरणांमधून समाजात असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे सांगत अशा घटनांमधील दोषींवर कठोर कारवाई होणे आणि राजकीय पातळीवर जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असल्याचे ठामपणे मांडले.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, लोकशाही व्यवस्था मजबूत राहण्यासाठी नैतिक मूल्ये आणि पारदर्शकता महत्त्वाची असल्याचे नमूद करत सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका करत “राजकीय सत्तेचा वापर जनतेच्या सुरक्षेसाठी झाला पाहिजे, संरक्षण देण्यासाठी नव्हे,” असे सांगत सत्तेतील जबाबदारीची आठवण करून दिली.

देशातील लोकशाही प्रक्रियेबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, विरोधी पक्ष आणि प्रादेशिक राजकीय शक्ती टिकून राहिल्या, तरच लोकशाही संतुलित राहू शकते. अन्यथा सामान्य नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित होण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे लोकशाही व सामाजिक समतेसाठी जागरूक राहणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले.

निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मतदारांना प्रलोभनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. पैशांचा गैरवापर, यंत्रणांचा दबाव अशा प्रकारांपासून लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी जनतेवरही आहे, “तुमचे मतदान केवळ उमेदवार निवडत नाही, तर येणाऱ्या पिढीचे भवितव्य ठरवते,” असे यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नाशिक शहराच्या विकासासाठी समताधिष्ठित आणि सर्वसमावेशक धोरणांची गरज असल्याचे सांगत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन केले. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, महिलांची सुरक्षा आणि लोकशाही मूल्ये या मुद्द्यांवर पक्ष कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले.

या सभेला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नाशिकमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version