Marathi e-Batmya

राहुल गांधी म्हणाले,… यही नियत और आदत भी

लोकसभा निवडणूकीपूर्वी तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आज पूर्तता करत शेतकऱ्यांचे दोन लाख रूपयांपर्यंतचे ३१ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय जाहिर केला. यासंदर्भात रेवंत रेड्डी यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि त्या बैठकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय जाहिर केला. या प्रसंगाचे औचित्य साधत राहुल गांधी यांनी एक्स वरील आपल्या प्रोफाईलवर या निर्णयासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करत जे बोलतो ते करून दाखवतो असे सांगत भाजपाला टोला लगावला.

राहुल गांधी पुढे आपल्या एक्सवरील अकाऊंटवर म्हणाले की, तेलंगणातील शेतकऱ्यांच अभिनंदन काँग्रेस सरकारने तुमचं दोन लाख रूपयांपर्यंतच कर्ज माफ केलं आहे. यासह काँग्रेसनं शेतकरी न्याय संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. या निर्णयामुळे राज्यातील ४० लाख शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. त्यामुळे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो हीच नियत आणि सवय असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस शासित राज्यातील सर्व सरकारांकडून सरकारच्या तिजोरीतील पैसा हा भारताच्या जनतेसाठीच आम्ही देत आहोत. शेतकरी, मजूर, वंचित यांच्या बळकटीकरणासाठी काँग्रेस हा झटणारा पक्ष आहे. राज्याच्या तिजोरीतून त्यांच्यासाठीच पैसे खर्च होतील. याची हमी काँग्रेसकडून दिली जाते. त्यामुळे भारताचा पैसा भारतीयांसाठी खर्च केला जाईल असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version