Marathi e-Batmya

सदाभाऊ खोतांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून अमोल मिटकरींचा टोला

विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीशी दोन हात करण्याच्या उद्देशान भाजपाकडून अपक्ष आमदार म्हणून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला. परंतु अखेर क्षणी अर्ज माघार घ्यायला लावला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठवित ट्विट करत टोला लगावला.

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठा फटका बसला आहे. यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष सावध झाले आहेत. २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक गुप्त पद्धतीने होणार असल्याने मोठा दगाफटका होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. शेवटच्या पंधरा मिनिटांपर्यंत कोणत्याही पक्षाकडून अर्ज मागे घेण्यात आला नव्हता. पण अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपाकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले जातील, हे स्पष्ट झालं आहे. सदाभाऊ खोत यांनी भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.

अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना खोत यांनी, भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया दिली. याचवरुन मिटकरींनी खोत यांना लक्ष्य केलंय. सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, असं मिटकरींनी ट्विटरवरुन म्हटलंय. तसेच पुढे बोलताना मिटकरींनी, आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही, असंही म्हटलंय.
पुढे बोलताना मिटकरी यांनी, भाऊ त्या फडणवीसांना सांगा, म्हणावं, म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसल, असं म्हणत खास गावरान भाषेत खोत यांना मिटकरींनी खोचक टोला लगावला.

Exit mobile version