अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल अचानक मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवित निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. त्यापाठोपाठ शरद पवार यांनीही आवाहन केले. त्यास २४ तासांचा अवधी लोटत नाही तोच आज सकाळपासूनच भाजपाच्या गोटात वेगवाग हालचाली सुरु असल्याचे दिसून आले. अखेर भाजपाने या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे आज जाहीर केले. भाजपाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून तसेच सर्वसामान्यांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत आणि वेगवेगळे अंदाजही लावले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपाला राज ठाकरेंनी लिहलेलं पत्र हा ‘स्क्रिप्ट’चा भाग होता अशी टीका भाजपावर केली.
या सर्व प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि राज ठाकरेंवर टीका केली. मुंबई सत्र न्यायालयात संजय राऊतांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यानेच भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला. अंधेरीत सेना उमेदवार ऋतुजा लटके या ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होत्या, भाजपाने सर्व्हे केला होता. त्याच सर्व्हेमध्ये भाजपा उमेदवाराचा सपशेल पराभव होणार, असं दिसत होतं. त्याच भीतीतून भाजपाने हा निर्णय घेतला. राहिला प्रश्न राज ठाकरे यांच्या पत्राचा… तर राज ठाकरे यांचं फडणवीसांना लिहिलेलं पत्र म्हणजे तो एक स्क्रिप्टचा भाग होता… असं म्हणत राऊतांनी भाजपा आणि राज ठाकरेंवर टीका केली.
दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीबाबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि सर्वच महाराष्ट्राच्या नेत्यांना वाटत होतं की ही निवडणूक होऊ नये. अशावेळी आमच्या शीर्ष नेतृत्वाने विचार केला, खरंतर मी देवेंद्र फडणवीस आणि आमच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो.
भाजपाच्या निर्णयावर संजय राऊत म्हणाले, ते पत्र स्क्रिप्टचा भाग…
