Marathi e-Batmya

सरकार पडण्यावर शरद पवार म्हणाले, शिमगा संपला ना आता?

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडव्या आधी पडणार असल्याचे भाकित भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्याला २४ तास ही उलटत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतित्तुर देत म्हणाले की, शिमगा संपला ना? माझ्या माहितीप्रमाणे कालच झाल्याचा उपरोधिक टोला भाजपा नेत्यांना लगावत राज्यातील सरकार पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

राज्यसभेवरील रिक्त होणाऱ्या ७ जागांपैकी एका जागेसाठी अर्ज भरण्यासाठी शरद पवार हे विधानभवनात आले होते. त्यानंतर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी पत्रकारांनी मध्य प्रदेशातील राजकिय घडमोडींबाबत विचारले असता ते म्हणाले की, एखादा नेता निवडणूकीत पराभूत झाला तर त्याला तात्काळ पक्षाची जबाबदारी देण्याची पध्दत बहुतेक त्या पक्षात नसावी. त्यामुळे तेथे काही गोष्टींना उशीर झाला. मात्र विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांची कॅपिसिटी अर्थात ताकद मला माहीत असल्याचे सांगत माझा त्यांच्यावर विश्वासही असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

आणखी एक-दोन दिवसानंतर कमलनाथ यांचे सरकार जाणार की राहणार याबाबत कळेल असे त्यांनी स्पष्ट केले.

फाऊख अब्दुला आणि ओमर अब्दुला यांच्या अटकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, केंद्र सरकारने त्यांना अटक करून काश्मीरमध्ये चुकीचा संदेश दिला आहे. वास्तविक पाहता तेथील परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी केंद्राने प्रयत्न करायला हवे होते. मात्र केंद्राने चुकीचे संदेश देवून बिघडविण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस पक्षाकडे नेतृत्व आहे काँग्रेसला भविष्य असून सध्याच्या परिस्थितीवरून त्याबाबत भाष्य करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version