Marathi e-Batmya

ईडी कारवाईवर पवार म्हणाले, विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर

मुंबईः प्रतिनिधी
महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर थेट निशाणा साधत म्हणाले की, लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका केली. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांना माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी केला. लोकांची बांधिलकी ठेवण्याचे काम सरकार करत असून राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्यासोबत घेवून काम करत आहे. राज्यात आज जे सरकार आहे त्याला सर्वसामान्यांचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.
तीन महिन्यात भाजपाचं सरकार येणार असल्याच्या दावा भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकताच केला. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे माहिती नव्हतं असा टोला त्यांनी लगावला. रावसाहेब दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहे. पण त्यांचा हा गुण मला माहित नव्हता. राजकारणात कधीही त्यांना ‘ज्योतिषी म्हणून ओळख मिळालेली नाही, पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आज कळाल्याचा उपरोधिक चिमटाही त्यांनी काढला.

Exit mobile version