Marathi e-Batmya

शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, बाकी सर्वजण आले अजित पवार आले नाहीत कदाचित….

बारामती तालुक्यावर एकमेव प्रभाव असलेले आणि मागील अनेव वर्षापासून प्रत्येक दिवाळी पाडव्याचा पवार कुटुंबियांचा एकमेव कार्यक्रम होत होता. मात्र यंदाच्या वर्षी अजित पवार यांनी स्वतंत्र दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम घेतल्याने बारामतीत दोन वेगवेगळे दिवाळी पाडव्याचे कार्यक्रम झाल्याचे दिसून आले. दरम्यान शरद पवार यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाबाबत सूचक वक्तव्य करत महायुती सरकारवर गंभीर आरोप केला.

गोविंद बागेत शरद पवार यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

बारामतीतील गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याला अजित पवार गैरहजर राहिल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना विचारले असता म्हणाले की, कार्यक्रमाला सर्वजण आले. कुटुंबातील सर्वजण आले होते. मात्र अजित पवार आले नाही. कदाचित कामात व्यस्त असतील असे सांगत सूचक वक्तव्य केले. मात्र दिवाळी पाडव्याचा दिवस हा घरातल्या वडील धाऱ्यांच्या आशिर्वाद घेण्याचा दिवस. दिवाळी पाडव्याची नेहमीची परंपंरा पाळली गेली असती तर लोकांना त्रास झाला नसता. एकाच कार्यक्रमासाठी लोकांना दोन दोन ठिकाणी जावे लागत असल्याबाबत खंतही यावेळी व्यक्त केली.

यावेळी बोलताना शरद पवार बोलताना म्हणाले, राज्यात सध्या विधानसभा निवडणूकांचे वातावरण आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पोलिस व्हॅनमधून रसद पुरवली जात असल्याची माहिती पोलिस दलातील अधिकाऱ्याकडून मला सांगण्यात आल्याचा गंभीर आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, सत्तेत असलेल्या काही लोकांना काहीही बोलण्याचा अधिकार मिळाल्या सारखे ते काहीही बोलत असतात. मात्र सत्तेत असताना भान ठेवून बोलावे लागते असा उपरोधिक टोलाही यावेळी अजित पवार यांना लगावला.

यावेळी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून जाती-पाती राजकारणाला खतपाणी मिळाल्याचा आरोप राष्ट्रवादीवर केला. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मला एखादी अशी घटना दाखवा की, जी जाती पातीच्या राजकारणाला खतपाणी घातलं. पण ज्याने आयुष्यात काहीच केलं नाही त्याच्या वक्तव्यावर अधिक काय बोलायचं असे सांगत राज ठाकरे यांना टोलाही यावेळी लगावला.

त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, मी राज्य सरकारमध्ये सात वेळा शपथ घेतली. मात्र कधी अशा पद्धतीने शासकिय वाहनांचा दुरूपयोग केला नाही. पण काहीजण अशा पद्धतीचा वापर करत असल्याचा आरोपही यावेळी सांगितले.

दरम्यान शरद पवार यांच्या पोलिस वाहनातून सत्ताधारी उमेदवारांना रसद पुरविली जात असल्याच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कदाचित त्यांच्या काळात तसे होत असेल. त्याचा भास त्यांना होत असेल. मात्र आमच्या काळात असे काही घडत नाही असा खुलासा केला.

देवेंद्र फडणवीस यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांना कशाची धमकी आली त्याबाबत मला माहित नाही. मात्र मलाही केंद्र सरकारने अशाच पद्धतीची सुरक्षा व्यवस्था देऊ केली होती. मात्र मी ती नाकारली. त्याबाबत केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांच्या सुरक्षेत वाढ केल्याप्रकरणाची माहिती माहित असेही यावेळी सांगितले.

गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांनी पुढील भावी मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचे नाव असलेले बोर्ड घेऊन आले. त्यावेळी शरद पवार यांनी त्या कार्यकर्त्यांसोबत फोटोही काढल्याचे दिसून आले.

Exit mobile version