Marathi e-Batmya

शरद पवार यांची माहिती, दोन तीन दिवसात नवा उमेदवार देऊ…

सातारा जिल्हा हा स्व. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर विश्वास असणारा जिल्हा आहे. पक्षाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर साताऱ्याच्या जनतेचे राष्ट्रवादीवर विशेष प्रेम आहे. साताऱ्यातील उमेदवाराबाबत एक दोन दिवसात निर्णय जाहीर करण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीसाठी उभं राहावं, अशी इच्छा होती. श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. पक्षासाठी सर्व काम करेन असे सांगितले आहे. पण त्यांनी प्रकृतीचे कारण देत उमेदवारी घेण्यास नकार दिला. माझ्याकडून मतदारांना न्याय देता येणार नाही. त्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही असं श्रीनिवास पाटील यांनी आपल्याला सांगितलं असल्याची माहिती दिली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, स्थानिक कार्यकर्त्यांनी साताऱ्यातून निवडणूक लढावी, असे देखील सांगितले आहे, तसेच, साताऱ्यातून लढण्यास अनेकजण इच्छुक आहेत. सातारा लोकसभा उमेदवारीबाबत येत्या २-३ दिवसांत निर्णय घेऊ. आज झालेल्या बैठकीमध्ये अनेक नावांवर चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील आणि सुनील माने हे इच्छुक आहेत. श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा होती. परंतु आरोग्यामुळे न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे लढण्यात अर्थ नाही. पण पक्ष सांगेल ते काम मी करेल. मला निवडणुकीच्या प्रक्रियेतून मुक्त करा, असं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे मी मुद्दाम साताऱ्यात येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे असे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.

शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. उमेदवारीबाबत आम्ही चर्चा केली. तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कशा प्रकारे असावा या संदर्भात चर्चा कालच्या बैठकीत करण्यात आली आहे. मी बैठकीला उपस्थित होतो, मात्र मला तिथे कोणी नाराज दिसलं नाही असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version