पुणेः विशेष प्रतिनिधी
वादग्रस्त ठरलेल्या आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरून अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी आपले मत व्यक्त करत वडापावला शिवाजी महाराजांचे नाव देताना कुठे गेला होता मान, शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का?, अशा प्रश्नांची सरबती शिवसेनेवर करत शिवसेनेचे नाव बदलून ठाकरे सेना असे ठेवा असा खोचल सल्लाही दिला.
त्या पुस्तकावरून वादंग निर्माण झाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या पुस्तक प्रश्नी छत्रपतींच्या वंशजांनी बोलावे अशी मागणी करत भाजपावासी झालेल्या शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांना एकप्रकारे राजकिय आव्हान दिले होते. त्यामुळे त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत शिवसेनेचा समाचार घेतला.
शिवाजी महाराजांचा सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पडणे हीच यांची लायकी असल्याची टीका करत शिवाजी महाराज राहू दे.. आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार तरी अमलात आणा असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला.
यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीचा समाचार घेतना या आघाडीतून शिव हे नाव का काढण्यात आलं असा खोचक सवालही त्यांनी केला.
आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकाबाबत विचारले असता ते म्हणाले की, पुस्तकाबाबत ऐकून वाईट वाटलं, मला एकट्यालाच नाही महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना होईल इतकी उंची जगात कुणाचीही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणासोबतच होऊ शकत नाही. मी या कुटुंबात जन्माला आलो, मी या वंशाचा भाग आहे याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, जाणते राजे वगैरे कुणीही नाहीत असं म्हणत शरद पवारांचं नाव न घेता यावर फारसे भाष्य करण्याचे टाळले.
उद्धव ठाकरेंना शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे. निदान त्यांनी आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार तरी आठवावेत आणि तसं वागण्याचा प्रयत्न करावा असा खोचक सल्ला देत वडापावला शिवाजी महाराजांचे नाव देताना कुठे गेला होता मान, शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का?, असा सवाल करत शिवाजी महाराजांच्या सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पडणे हीच यांची लायकी आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर टीका केली.
थेट वडापावला शिवाजी महाराजांचे नाव दिल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला. शिवसेनेवर टीका करताना उदयनराजेंनी शिववडा योजनेवरुन सत्ताधारी पक्षावर टीकास्र सोडले. “शिववडा हे नाव कुठून आले. महाराजांच्या नावाचा असा वापर का केला गेला. शिववडा असं नाव ठेवता तेव्हा आदर कुठे जातो. वडापावला महाराजांचं नाव कसं काय दिलं जाऊ शकतं, असा उपरोधिक सवालही त्यांनी शिवसेनेला केला.
शिवसेना नाव देताना छत्रपतींच्या वारसांना विचारले होते का?
