Marathi e-Batmya

संजय राऊत म्हणाले, चिखल फेकणाऱ्यांचे हातही घाणच

मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपा आणि शिवसेने दरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत कोणता आरोप करतात आणि त्यास भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे कोणते प्रत्युत्तर देत नवा आरोप करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेले असायचे. आता त्यानंतर पुढील अंक सुरु झाला असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत करत पंतप्रधान कार्यालयाकडे गैरव्यवहाराचे पुरावे सादर केले असून त्याबाबत लवकरच पत्रकार परिषदेत बॉम्ब फोडणार असल्याचे सांगितले.

संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाकडे कागदपत्र सोपवल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधत म्हणाले की, केंद्र सरकारकडून कारवाईची अपेक्षा नाही. कारण केंद्रातल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशांनुसार महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या सूडाच्या कारवाया सुरू आहेत. महाराष्ट्रात जास्त. जणू काही केंद्रीय तपास यंत्रणांना संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच काम आहे. महाराष्ट्रातच सर्वकाही घडतेय. महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करायचे. खोटी प्रकरणे, खोटे पुरावे उभे करायचे. अशी चिखलफेक सुरू आहे. पण जे चिखल फेकत आहेत, त्यांचे हात देखील किती बरबटलेले आहेत हेसुद्धा देशाला कळायला हवे असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

पंतप्रधान कार्यालयाला सादर केलेल्या पुराव्याबाबत बोलताना म्हणाले की, यामागे कोणते सिंडिकेट आहे, त्याबाबतची माहिती मी काल पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केली आहे. हा रेकॉर्ड आहे की आम्ही तुम्हाला कळवले आहे, पण तुम्ही त्यावर काहीही केलेले नाही असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणा देखील त्यांचे काम करतीलच. पण केंद्रातल्या तपास यंत्रणा काय करत आहेत? भाजपामधल्या दोन-चार लोकांना हाताशी धरून कशा पद्धतीने वेगळे क्रिमिनल सिंडिकेट चालवत आहेत, त्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला पोहोचवणे हे शिवसेनेचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे. त्याबाबत माहिती मी वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाला देत जाईन आणि मुंबईत येऊन पत्रकार परिषद घेत जाईन असा इशाराही त्यांनी भाजपाबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणांना दिला.

Exit mobile version