Marathi e-Batmya

जयंत पाटील यांची खोचक टीका, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री साप चावल्यासारखे गप्प

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ‘बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा ठराव’ करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री साप चावल्याप्रमाणे गप्प बसले आहेत अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला एक इंचही जमिन देणार नसल्याचे वक्तव्य केले. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरही मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य सुरु आहेत. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अद्यापही शांतच आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वरील ट्विट करत खोचक टीका केली.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आता तरी नेभळटपणा सोडून आपल्या विधानसभेत कर्नाटकच्या सरकार आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधाचा ठराव मांडावा अशी मागणी करणारे ट्वीटही त्यांनी यावेळी केले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ‘बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा ठराव’ करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री साप चावल्याप्रमाणे गप्प बसले आहेत अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.
मराठी भाषिकांवर अन्याय होऊनही महाराष्ट्राचे शिंदे – फडणवीस सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही बाहेर निघत नाहीये असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

कर्नाटक राज्याच्या येणाऱ्या निवडणुकीतील भाजपचा विजय हा शिंदे – फडणवीस यांना जास्त महत्वाचा वाटत आहे असा खोचक प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version