Marathi e-Batmya

अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,…

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत घरच्याच मैदानावर अर्थात बारामतीत नणंद विरूध्द भावजय अर्थात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी दिली. त्याबाबत एका वृत्तवाहिनीला अजित पवार यांनी मुलाखत देताना ती मोठी चूक होती अशी कबुली दिली. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, त्यांच ते वक्तव्य मी ऐकलंल नाही, पाहिलं नाही. त्यामुळे त्या वक्तव्यावर मी बोलणार नसल्याचे सांगत अजित पवार यांच्या वक्तव्यावर अधिक बोलण्याचे टाळले.

तसेच मराठा आरक्षण प्रश्नी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही पारदर्शकपणे काम केलय. मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत, भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची सहकार्याची तयारी आहे. मी, आणि अमोल कोल्हे १० वर्ष खासदार आहोत. आम्ही ससंदेत बोललो आहोत. संविधानिक दुरुस्ती करावी लागेल. महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे. आम्ही या बाबतीत चर्चा करायला तयार आहोत. प्रस्ताव ताकदीने सरकारने मांडावा. आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू असे स्पष्टीकरणही यावेळी दिले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकार आणि त्यांचे मंत्री यांच्यात आरक्षणावर एकवाक्यता दिसत नाही. सरकार एक सांगत असेल तर त्यांचे मंत्री बाहेर वेगवेगळ्या मंचावरुन सरकारच्या विपरीत भूमिका घेताना दिसत आहे, त्यामुळे हा प्रश्न चिघळत चालला आहे. मराठा, लिंगायत आणि भटके विमुक्त समाजाचे सरकारमधील नेते वेगळं बोलत आहेत. महाराष्ट्रात वाढलेल्या कटूतेला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. मराठा आरक्षण आंदोलकांसोबत मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारमधील मंत्री वेळोवेळी चर्चा करत आले आहेत. वृत्तपत्र आणि चॅनल्सवरच आम्ही बातम्या पाहिल्या आहेत की त्यांना काही आश्वासनेही दिली गेली. तेव्हा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही सरकारची असल्याचेही यावेळी सांगितले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, आमची भूमिका आहे की, राज्यात आणि केंद्रात तुमचेच सरकार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागत असेल तर केंद्र सरकारला ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार आहे. राज्य सरकाने याबाबत केंद्राकडे आग्रही भूमिका मांडावी. आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा द्यायला तयार असल्याचेही यावेळी सांगितले.

केंद्र सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सर्वात जास्त संसदेत मी बोलले आहे. मी आमच्या संघटनेबद्दल जबाबदार आहे. आम्ही दडपशाही केलेली नाही. विरोधात बोललो म्हणून इन्कम टॅक्स नोटीस काढलेली नाही. आमच्या ७० वर्षांचा हिशोब काढता, आम्ही कधी असं गलिच्छ राजकारण केलेलं नाही. सत्तेत आल्यावर करणारही नसल्याचा खुलासाही यावेळी केला.

महायुती सरकारच्या कारभारावर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात महागाई, रोजगार आणि भ्रष्टाचार हा प्रचंड प्रमाणात वाढला असून, हे सरकार आल्यापासून अतिशय गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू असल्याचा आरोपही यावेळी केला.

Exit mobile version