Marathi e-Batmya

सुप्रिया सुळे यांचा इशारा, एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका

एसएससी बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून विद्यार्थ्यांवर अनेक गोष्टी लादल्या जाताहेत. इतर कुठलेही राज्य या गोष्टी करत नाहीये, महाराष्ट्र एवढी आग्रही भूमिका का घेतोय ? एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका असे इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दिला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे जनतेच्या भावना नेहमी ऐकून घेणे हीच लोकप्रतिनिधींची खरी ताकद असते. कोणी एकत्र येण्याची भावना व्यक्त केली तर आम्ही ती ऐकून घेतली. त्यांनी पुन्हा एकदा या विषयाचे गांभीर्य अधोरेखित केले. शिक्षण हा विषय खूप गंभीर आहे. हा त्यांचं सरकार की आमचं सरकार असा प्रश्न नाही. शिक्षणासंदर्भातील निर्णय तज्ज्ञांनी आणि पालकांनी मिळून घ्यायला हवा, असे आवाहनही यावेळी केले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे. हा राजकीय मुद्दा नाही. भाषा, शिक्षण हा एक असा मुद्दा आहे, जो खूप गांभीर्याने घेतला पाहिजे. आपण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जायला हवे. इतर कोणतेही राज्य अशाप्रकारे काम करत नाही. महाराष्ट्र इतका आग्रही पवित्रा का घेत आहे? हे मला समजत नाही. आपण एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू शकत नाही. दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चात सहभागी होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळेंनी आम्ही या मोर्चात पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे, असे सांगितले.

शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जनतेने फार विश्वासाने महायुतीला मतदान केलंय. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र व्हावा, ही अपेक्षा आहे. असे असताना जर घोटाळ्यांचे आरोप होत असतील, तर त्याची एसआयटीच्या माध्यमातून पारदर्शक चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

Exit mobile version