Marathi e-Batmya

रेल्वे मंत्र्याचा तो व्हिडिओ दाखवत काँग्रेसचा सवाल, ते बहुचर्चित ‘कवच’ कोठे गेले ?

ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे. या अपघातील मृतांची संख्या पाहून मन सुन्न झाले. अपघातात एकही बळी जाऊ नये अशीच अपेक्षा आहे. अपघात रोखणारे महाकवच मोठा गाजावाचा करु आणले होते ते कोठे गेले? एवढा मोठा अपघात झाला त्याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित झाली पाहिजे. ओडीशा अपघाताची नैतिक जबाबदारी म्हणून रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

तर रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कवच बसविण्यात येत असल्याचा जूना व्हिडिओ प्रदेश काँग्रेसने आपल्या ट्विटरवर प्रसारीत केला. तसेच कवच बसविण्याची घोषणा २०२२ साली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली होती. त्याचे काय झाले असा सवालही ट्विटरवरून काँग्रेसने केला.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, १९५६ साली महबूबनगर रेल्वे अपघात झाला असताना तत्कालीन रेल्वे मंत्री लालबहाद्दुर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. आजचा अपघात भयंकर आहे, जिवित हानी प्रचंड झाली आहे, त्याची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुळात रेल्वे मंत्री असतात कुठे हाच प्रश्न आहे. देशात कुठेही रेल्वेला हिरवा झेंडा दाखवायचा असेल तर पंतप्रधानाच असतात. ओडीशातील रेल्वे अपघातात अत्यंत भयानक व दुःखद आहे. याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.

Exit mobile version