Marathi e-Batmya

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टोलमाफी जाहिर

राज्याचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठू-रूकमाईच्या भेटीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी मोठ्या प्रमाणावर पंढरपूरला जातात. त्यामुळे पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्या वारकरी दिंड्या, त्यांच्यासोबत असलेली वाहने यांना पथकरातून अर्थात टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३ जुलै ते २१ जुलै या कालावधीकरीता ही टोलमाफी देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय राज्य सरकारकडून जाहिर करण्यात आले आहे.

पंढरपूरला आषाढी वारी निमित्ताने जाणाऱ्या वारकरी संप्रदाय आणि भक्तांकडून कधी वारीसोबत चालत जातात तर कधी खाजगी वाहनाने विठूरायाच्या दर्शनासाठी जातात. त्यामुळे पंढरपूरात किमान ५ ते ७ लाख भाविक दाखल होतात. यापार्श्वभूमीवर वाहनाने पंढरीत दाखल होणाऱ्या वारकरी भक्तांसाठी पथकरात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टोलमाफीचा लाभ उठविण्यासाठी संबधित वाहन चालकाने जवळच्या पोलिस स्टेशनकडून किंवा परिवहन विभागाकडून आषाढी एकादशी २०२४ असे स्टिकर्स करून घ्यावेत असे शासन निर्णयाद्वारे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सदर वाहन चालकाने आपले नाव गाडीचा क्रमांकही पोलिस स्थानकात किंवा आरटीओ कार्यालयात नोंदवावा असे असेही सांगण्यात आले आहे.

आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना ३ जुलै ते २१ जुलै या कालावधीतच हा लाभ मिळणार आहे. तसेच टोलमाफी मुंबईतील सायन ते पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगलोर द्रुतगती महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूर ते राज्याच्या सीमेपर्यंतचा महामार्ग, तसेच या महामार्गाला जोडले जाणारे इतर मार्गावरही पथकर टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टोलमाफीचा हाच तो शासन निर्णयः-

Exit mobile version