Marathi e-Batmya

वंचित आघाडी कोणाला वंचित करणार ?

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात चार टप्प्यात मतदान झाले. मात्र या चारही टप्प्यात वंचित आघाडीच्या झंझावाती प्रचारसभेला मिळालेला प्रतिसाद आणि जनमानसांचा कल झुकल्याने प्रस्थापित भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित करणार की वंचित स्थापित होणार यावरून जनमानसांबरोबरच राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीने आपले उमेदवार उभे केले. यातील नागपूर, सोलापूर येथे दलित समुदाय मोठ्या प्रमाणावर आहे. तर औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली येथे दलित समुदायाबरोबरच मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय सांगलीत मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची लोकसंख्या जास्त असल्याचे दिसून येते.
त्यामुळे या सात मतदारसंघातील काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा प्रचारादरम्यान चांगलाच कस लागला. विशेष म्हणजे या पाचही मतदारसंघातील विद्यमान खासदार हे राज्यातील बडे नेते असल्याने या लढतीकडे राज्याबरोबरच देशाचेही लक्ष लागून राहीले आहे.
तर राज्यातील इतर ४२ लोकसभा मतदारसंघात असलेले दलित, मुस्लिम, धनगर, भटके-विमुक्त, माळी समाज वंचित आघाडीबरोबर किती जाणार यावरच त्या त्या भागातील भाजप-शिवसेना युतीच्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. राज्यातील एकंदरच राजकिय परिस्थिती पाहता वंचित आघाडीच्या किमान ४० जागांवरील उमेदवारांना २५ ते ७५ हजार मते मिळण्याची शक्यता प्रत्येक मतदारसंघातील स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे संभावित विजयी उमेदवाराच्या मतांमध्ये घट येवून निवडूण येणार पराभूत होवू शकतो तर पराभूत होणारा उमेदवार विजयी होईल अशी चर्चाही सध्या राज्याच्या राजकिय वर्तुळात सुरु आहे.

Exit mobile version