मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यातील ४८ जागांपैकी जवळपास ४४ जागांवर वंचित आघाडीच्या मत विभागणी धोरणामुळे भाजप-शिवसेना युतीने आघाडी घेतली आहे. तर एकट्या औरंगाबादेत वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची हमी देणारी मावळ, शिरूर, अहमदनगर, रायगड, बुलढाणा, परभणी, अमरावती, सातारा, बारामती, माढा, जळगांव या लोकसभा मतदारसंघासह १२ ठिकाणी विजयाची खात्री होती. परंतु यातील सातारा आणि बारामती, शिरूर या तीन मतदारसंघात रायगड, अमरावतीत काटे की टक्कर सुरु असून इतर ठिकाणी सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किमान २० ते ५० हजारांनी मागे पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसला नांदेड, यवतमाळ-वाशिम, सोलापूर यासह ८ ठिकाणी विजयाची आशा होती. परंतु या ८ ही मतदारसंघातही काँग्रेसचे उमेदवार २० ते ५० हजाराच्या मतांच्या फरकाने मागे पडताना दिसत आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे हंसराज अहिर विरूध्द काँग्रेसचे धानोरकर यांच्यात काटे की टक्कर सुरु असल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबाद वगळता यासर्वच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना ५० हजाराच्या आसपास मते मिळाली आहेत. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांना बसला असून तितकेच मार्जिन त्यांचे कमी झाले. त्यामुळे किमान महाराष्ट्रात तरी वंचित बहुजन आघाडीमुळे मोठा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसत असल्याचे दिसत आहे.
वंचित आघाडीमुळे राज्यात युतीचीच आघाडी
