Marathi e-Batmya

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानी सरकारकडून मुंबईकरांची लुट मालमत्ता करात तब्बल १२-१३% वाढ

बीएमसीने २०२४-२५ या आर्थिक वर्षात मुंबईकरांकडून मालमत्ता कराच्या नावाखाली विक्रमी ६,२०० कोटी रुपये वसूल केले असताना पुन्हा मुंबईकरांना लुटत आहेत. ही नवीन ईस्ट इंडिया कंपनी मुंबईकरांच्या खिशात सरळ हात घालत असून मालमत्ता करात तब्बल १२-१३% वाढ करण्याचा अदानी सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप करत मालमत्ता करातील कोणत्याही वाढीला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे, वेळप्रसंगी सरकार विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, अदानी सरकारने आधी मुंबईतील मालमत्तांसाठी रेडी रेकनर दर ४% टक्क्यांनी वाढवला, ज्यामुळे घर खरेदी करणे महाग झाले आणि अप्रत्यक्षपणे मुंबईकरांचा मालमत्ता कर देखील वाढणार आहे. घनकचऱ्याचे व्यवस्थापन ही महापालिकेची बंधनकारक जबाबदारी असताना घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क नावाने “अदानी लगान” मुंबईकरांवर लादण्याचा प्रस्ताव आणला आहे. एवढंच नाही तर पाणी शुल्कात ८% वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. लाडक्या उद्योगपती मित्राला खायला घालण्यासाठी भाजपा युती सरकार मुंबईकरांकडून आणखी किती पैसे वसूल करणार? असा सवालही यावेळी केला.

खा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, २०२२ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, भांडवली मूल्याधारित कर प्रणालीच्या नियमांमध्ये बदल का केले गेले नाहीत? मालमत्ता करात चुकीची आकारणी झालेल्या मुंबईकरांना परतफेड का दिली गेली नाही? हे दुसरं-तिसरं काही नसून ईस्ट इंडिया कंपनी राज्य २.० असून मुंबईला लुटत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कर निर्धारण पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने तत्काळ आपला अहवाल सादर करावा आणि तो विलंब न करता अंमलात आणावा अशी मागणीही यावेळी केली.

Exit mobile version