Marathi e-Batmya

विनायक राऊत यांची मागणी, एकनाथ शिंदे, उदय सामंत, निलेश राणे यांच्यावर कारवाई करा

न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावून जाहिर कार्यक्रम, जाहिर सभा घेऊ नये घेता येत नसताना कुडाळ येथे रात्री १० नंतर जाहिर सभा घेतली. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असून या अवमानप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते विनायक राऊत यांनी एका पत्राद्वारे जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली.

शिवसेना उबाठाचे नेते विनायक राऊत त्यांच्या पत्रात म्हणाले की, गुरुवारी २४ एप्रिल रोजी कुडाळ येथील एसटी बसस्थानकाच्या मैदानावर न्यायालयाचे आदेश असतानाही रात्रो १० वाजल्यानंतर शिवसेना (शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना) च्या वतीने जाहिर सभेचे आयोजन केले. विशेष म्हणजे ही सभा एकनाथ शिंदे हे काश्मिरातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे अडकून पडलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांचे आभार मानण्यासाठी जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे आदी उपस्थित होते.

पुढे विनायक राऊत म्हणाले की, रात्री १०.०५ ते ११.३५ यावेळेत ध्वनीक्षेपकाचा पूर्ण क्षमतेने वापर करत एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. रात्री १० नंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करू नये आणि जाहिर सभा घेऊ नये असे न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही ही जाहिर सभा घेण्यात आली. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पूर्ण उल्लंघन करत अवमानही केला आहे. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणीही केली.

Exit mobile version