Marathi e-Batmya

एनआयएने डॉ. तेलतुंबडे, नवलखा यांना घेतले ताब्यात

 

मुंबई: प्रतिनिधी

पुणे येथील एल्गार परिषद आयोजित केल्याप्रकरणी विचारवंत तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नात जावई डॉ. आनंद तेलतुंबडे आणि नवलखा यांना एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले. या दोन्ही विचारवंताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत आज संपत आल्याने त्यांनी अखेर शरणागती पत्करली.

या गुन्ह्यात डॉ.तुलतुंबडे यांच्यावर माओवादी नक्षलवाद्याशी संबध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांनी एल्गार परिषदेच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर एनआयएने ठेवला.

न्यायालयाने दिलेली मुदत संपल्याने डॉ. तेलतुंबडे हे स्वत:हून एनआयएच्या कार्यालयात हजर झाले. त्यावेळी त्यांना सोडण्यासाठी प्रकाश आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे, आनंदराज आंबेडकर आणि आमदार कपिल पाटील आदी उपस्थित होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचे नात जावई आणि प्रख्यात विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना NIA ने ताब्यात घेणं यासारखी वेदनादायक दुसरी गोष्ट नाही. लॉकडाऊनच्या काळात लोकशाही हक्कांची होणारी पायमल्ली पाहण्या पलीकडे काही करता येत नाही, याचं दुःख आहे. या कुटुंबाशी असलेल्या वैचारिक नात्यातून आज त्यांच्यासोबत राहता आलं इतकंच  अशी प्रतिक्रिया आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केलीय.

 

Exit mobile version