मुंबईः प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि त्यांच्या खासदारांकडून जय्यत तयारी करण्यात येत असतानाच भाजपचे बरेच खासदार सध्या संभ्रमावस्थेत आणि भेदरलेल्या अवस्थेत आहेत. पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, पाकिस्तानातील सर्जिकल स्ट्राईक यावरून भाजपच्या खासदारांमध्ये चलबिचल असतानाच भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह हे चुनाव जितने का हम पे छोडो, बाकी हम जो बोलते है उतनाही करो असे सांगत असल्याने नेमके काय समजायचे काही कळत नसल्याचे भाजप खासदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
मागील साडे-चार वर्षात केंद्रातील सरकारकडून अनेक घोषणा, योजना जाहीर करण्यात आल्या. परंतु त्या योजनेचा लाभ देशातील किती जनतेला मिळाला याची वास्तविक माहिती काही बाहेर येत नाही. त्यातच नोटबंदीचा फटका सर्वांनाच बसल्याने रोजगाराच्या संधीचे प्रमाण कमी होत आहे. दुसऱ्याबाजूला उद्योगधंदेही बंद होत आहेत. या गोष्टी घडत असतानाच देशातील सांप्रदायिक वातावरण दुषित होत असल्याने लोकांच्या मनामध्ये लपलेल्या असंतोषाचा फटका यंदाच्या निवडणूकीत तर बसणार नाही ना अशी भीती वाटायला लागली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आतापर्यंत कोणतीही विकास कामे राबविण्याचे अधिकार एकहाती ठेवण्यात आले. त्यामुळे निवडणूकीसाठी लागणारा खर्च काही केल्या जमविता आला नाही. त्यातच आता अमित भाई हे निवडणूका जिंकण्याची काळजी करू नका असे म्हणतात. नेमके यांच्या मनात काय चाललेय काही समजायला मार्ग नसल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी जेव्हा देशात युध्द परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी केंद्रात सत्तेवर असलेला पक्ष पुन्हा सत्तेत आलेला कधी दिसला नाही. आता जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यास भारतीय सैन्याने दिलेले प्रतिउत्तर आणि त्यावरून झालेले राजकारण यामुळे तर सर्वसामान्य जनतेत वेगळीच भावना निर्माण झाल्याचे दिसून येत असून त्याची चर्चाही जनतेत व्हायला सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे अमित भाईंच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा हे कळेनासे झाल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
चुनाव जितने का हम पे छोडो, बाकी हम जो बोलते है उतनाही करो
