Marathi e-Batmya

पश्चिम बंगालमध्ये माशांचा मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी छेडला, मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याकडून तातडीने प्रत्युत्तर

पश्चिम बंगालमध्ये, बंगाली घरांमध्ये मुख्य अन्न असलेला त्यांचा लाडका मासा स्वयंपाकघरातून थेट निवडणूक प्रचारात पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एका सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपल्या लोकांना पुरेसे मासे खाऊ घालण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केल्यानंतर, हा साधा मासा अनपेक्षितपणे वादाचा मुद्दा बनला. पंतप्रधान मोदी यांनी पुढे यावर जोर देत म्हटले की, प्रचंड मागणी असूनही बंगाल माशांच्या उत्पादनात ‘आत्मनिर्भर’ नाही आणि ते इतर राज्यांमधून आयात करावे लागते.

पंतप्रधान मोदी यांनी ह एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न होता. पहिले, ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवणे. दुसरे, भाजपाला ‘मांसाहारी विरोधी’ म्हणून चित्रित करण्याच्या तृणमूलच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर देणे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की माशांना किती मागणी आहे. आणि बंगाल स्वयंपूर्ण नाही… इतर राज्यांमधून मासे आयात केले जातात. आपल्या १५ वर्षांच्या राजवटीत टीएमसी तुम्हाला मासे देऊ शकलेली नाही,” असे वक्तव्य हल्दिया येथील सभेत केले.

पंतप्रधान मोदी यांना याची पूर्ण जाणीव आहे की, बंगाली लोकांसाठी मासे हे केवळ अन्न नाही. ते बंगाली अस्मितेचा आणि अभिमानाचा अविभाज्य भाग आहे, बिहार आणि आसाम पूर्वी मासे आयात करायचे. आता त्यांनी माशांचे उत्पादन दुप्पट करून ते स्वयंपूर्ण झाले आहेत,” असे सांगत हा मुद्दा ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला.

पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार काही तासांतच मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी घेत मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिले. एका निवडणूक प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निदर्शनास आणून दिले की, बंगाल पूर्वी आंध्र प्रदेशमधून मासे आयात करायचा, पण आता ते थांबले आहे. पूर्वी आम्ही हैदराबादमधून मासे आयात करायचो. पण आता ८०% मासे बंगालमध्येच तयार होतात. त्यांना बंगालमधील माशांच्या उत्पादनाबद्दल काळजी करण्याची गरज नाही, असा उपरोधिक टोला लगावत जोरदार प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान मोदी आणि ममता यांच्यातील तीव्र शाब्दिक चकमकीमुळे सोशल मीडियावर एक व्यापक चर्चा सुरू झाली आहे. बंगाल इतर राज्यांकडून मासे आयात करतो का?

आंध्र प्रदेशनंतर बंगाल हे भारतातील दुसरे सर्वाधिक मासे उत्पादन करणारे राज्य आहे. येथे सुमारे २३.७४ लाख टन माशांचे उत्पादन होते (जे भारताच्या एकूण उत्पादनाच्या सुमारे १२% आहे). विशेष म्हणजे, बंगालमधील सुमारे ८०% लोकसंख्या मासे खाते.

तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की या यादीत बांग्लादेश का नाही, कारण बंगालला त्याच्या चवीमुळे ‘माशांची राणी’ म्हणून ओळखला जाणारा हिलसा मासा शेजारच्या देशाकडून मोठ्या प्रमाणात मिळतो.

खरं तर, अनेक दशकांपासून बंगालचा लाडका हिलसा मासा फक्त दोन ठिकाणांहून येत असे – बांग्लादेशातील पद्मा नदी आणि राज्यातील इतर नद्यांमधून. २०१२ मध्ये, तत्कालीन शेख हसीना सरकारने हिलसा माशाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तथापि, तेव्हापासून बांग्लादेश दरवर्षी सदिच्छा म्हणून काही हजार मेट्रिक टन मासे भारताला पाठवत आहे.

गुरुवारी आपल्या सभेत ममता बॅनर्जी यांनी ठामपणे सांगितले की, आता संपूर्ण बंगालमध्ये हिलसा मासा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. “बंगालमध्ये आता हिलसा मासा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आम्ही डायमंड हार्बरमध्ये हिलसा उत्पादनासाठी एक संशोधन केंद्र स्थापन केले असल्याचेही सांगितले.

Exit mobile version