लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी, इंधनाच्या वाढत्या किमती, भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना नुकतीच भेट दिलेली ‘मेलोडी’ टॉफीची पेटी या मुद्द्यांवरून, “व्यस्त” असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. गंभीर आर्थिक समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून, सरकार या समस्यांना गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, देशावर ओढवणाऱ्या संभाव्य आर्थिक संकटाची चिन्हे केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स खात्यावर टीव्ट करत म्हणाले की, “आपल्या डोक्यावर आर्थिक संकटाचे वादळ घोंगावत आहे आणि आपले पंतप्रधान मात्र इटलीमध्ये टॉफी वाटण्यात व्यस्त आहेत! शेतकरी, तरुण, महिला, कामगार आणि छोटे व्यापारी हे सर्वजण हवालदिल झाले असून त्यांचे डोळे पाणावले आहेत; दुसरीकडे पंतप्रधान मात्र हसत आहेत आणि ‘रील्स’ बनवत आहेत, तर भाजपाचे लोक त्यांना साथ देत टाळ्या वाजवत आहेत. हे काही नेतृत्व नाही, तर केवळ एक फार्स (ढोंग) आहे,” अशी टीकाही यावेळी केली.
आर्थिक तूफ़ान सर पर है, और हमारे प्रधानमंत्री इटली में टॉफ़ी बाँट रहे हैं!
किसान, युवा, महिलाएँ, मज़दूर और छोटे व्यापारी सब रो रहे हैं – PM हंसकर रील बना रहे हैं, और BJP वाले ताली बजा रहे हैं।
यह नेतृत्व नहीं, नौटंकी है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 20, 2026
पंतप्रधान मोदी यांच्या इटली दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी ही टीका केली. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी रोम येथे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी मेलोनी यांना ‘मेलोडी’ टॉफींचा एक पुढा भेट दिला होता; यामुळे या दोन नेत्यांच्या संदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर गाजलेला ‘मेलोडी’ (Melodi) हा ट्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आला.
भारत गंभीर आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. या परिस्थितीसाठी त्यांनी वाढता जागतिक तणाव आणि भाजपाप्रणीत सरकारने केलेला ‘आर्थिक गैरकारभार’ याला जबाबदार धरले.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, “आता एक आर्थिक वादळ जवळ येत आहे—असे वादळ जे भारताने यापूर्वी कधीही पाहिले नाही. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Hormuz सामुद्रधुनी) बंद करण्यात आली आहे. तरीही, पेट्रोलचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा हे लोक करत आहेत… भाजपचे सदस्य माझी खिल्ली उडवतात,” असे रायबरेली येथे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी पुढे म्हटले, “ते मेलोनी यांच्यासोबत टॉफी खात आहेत आणि व्हिडिओ बनवत आहेत—जणू काही हा सर्व प्रकार केवळ एक विनोदच आहे, अशा आविर्भावात ते वागत आहेत—आणि नंतर मात्र इथे परत येऊन हात जोडून उभे राहतात.”
राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावरूनही सरकारवर पुन्हा एकदा टीका केली. देशाची संपत्ती आणि सार्वजनिक संस्था मूठभर उद्योगपतींच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोप यावेळी केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची आर्थिक व्यवस्था विकून टाकली आहे. त्यांनी भारताची आर्थिक व्यवस्था अंबानी, अदानी आणि अमेरिकेच्या हाती सोपवली आहे. आता एक आर्थिक संकट (वादळ) ओढवत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकार तुम्हाला त्यापासून वाचवू शकणार नाहीत,” असा इशाराही यावेळी दिला.
LIVE: Bahujan Swabhimaan Sabha | Raebareli, Uttar Pradesh https://t.co/LCXMb4LyS1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 20, 2026
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपाच्या नेतृत्वावर निशाणा साधत, राहुल गांधी म्हणाले की, या संघटनांवर संविधानाला कमकुवत केल्याचा आरोप केला. तसेच, नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात यापूर्वी केलेल्या विधानांवर आपण ठाम असल्याचेही पुन्हा एकदा स्पष्ट केले.
राहुल गांधी म्हणाले की, “जेव्हा हे RSS कार्यकर्ते तुमच्यासमोर येतील, तेव्हा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल बोलतील; त्यावेळी तुम्ही त्यांच्या तोंडावरच सांगितले पाहिजे की, तुमचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि तुमची संघटना (भाजप) हे देशद्रोही आहेत. तुम्ही भारताला विकण्याचे काम केले आहे. तुम्ही संविधानावर हल्ला करण्याचे काम केले आहे,” असल्याचेही म्हणाले.
वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतींवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी लोकांना परदेश प्रवास आणि सोन्याची खरेदी टाळण्याचा, त्याऐवजी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. राहुल गांधी यांनी असाही इशारा दिला की, येत्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना खतांच्या तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो. तसेच, महागाईसह पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, स्वयंपाकाचा गॅस, डाळी आणि तांदूळ यांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असल्याचेही सांगितले.
राहुल गांधी शेवटी म्हणाले की,निवडणुकीपूर्वी असे सांगितले गेले होते की, पेट्रोल किंवा गॅसचा कोणताही तुटवडा नाही. पेट्रोलच्या किमती वाढणार नाहीत. आज जेव्हा पेट्रोलच्या किमती वाढत आहेत, तेव्हा अंबानी भारतातून पेट्रोलची निर्यात करत आहेत. अंबानी रशियाकडून पेट्रोल खरेदी करतात आणि ते परदेशात विकतात; आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना आर्थिक मदत (फंडिंग) करतात. हेच सत्य आहे असा आरोपही यावेळी केला.
