Marathi e-Batmya

अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमातच कर्जमाफीबाबत कृषी मंत्री भरणे यांचे वक्तव्य

मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. त्यानंतर कर्जमाफी घोषणेची अंमलबजावणीस अद्यापही सुरुवात केली नाही. त्यातच यंदाचा पावसाळा आता तोंडावर आलेला असताना कर्जमाफीची अंमलबजावणी करणे आवश्यक बनले आहे. मात्र राज्य सरकारच्या तिजोरीत पैशांचा तुटवडा असल्याने आणि विविध प्रकल्पांवर सध्या खर्च सुरु असल्याने कर्जमाफीसाठी पैसा कोठून उभा करायचा असा प्रश्न सरकारला पडला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा केली खरी पण त्याची अंमलबजावणी करण्याचे आतापर्यंत टाळले आहे. मात्र कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अहिल्यानगर येथील चौडीत आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना वक्तव्य केले.

मात्र याच कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र कर्जमाफीबाबत चकार शब्द काढला नाही. त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत संशय निर्माम झाला आहे.

राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेप्रमाणे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी ५० हजार रूपयांची प्रोत्साहन निधी म्हणून माफ करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची परवानगी घेऊन मी ही घोषणा करत आहे की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. आता येणाऱ्या ८ ते १० दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे जाहिर केले.

तसेच दत्तात्रय भरणे पुढे बोलताना म्हणाले की, मी कृषी मंत्री आहे म्हटल्यावर काही तरी सांगितले पाहिजे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. महायुतीचं सरकार जनतेबरोबर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे तिन्ही नेते जनतेसाठीच काम करत आहेत असं सांगितले.

Exit mobile version