Marathi e-Batmya

राहुल गांधी यांचा आरोप, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच मतांची भरघोस वाढ

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी आणि मतदानाच्या दिवशी एकूण मतदारांच्या संख्येत झालेली वाढ याबाबत एकूणच संशयकल्लोळ आहे. त्यावरून काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकूण निवडणूकीच्या कामावरून आक्षेप घेत, संपूर्ण महाराष्ट्राची मतदारसंघ निहाय मतदार यादी आणि मतदानाच्या दिवशीची सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली. तसेच यासंदर्भात न्यायालयात याचिका असून त्यावर उद्या अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

या संदर्भात आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नवी माहिती एक्सवर पोस्ट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातच मतदारांच्या संख्येत आणि मतदानाच्या दिवशी बुथवर एकूण किती मतदारांच्या संख्येत कितीने वाढ झाली याबाबत प्रश्न उपस्थित करत संपूर्ण निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सवाल उपस्थित केला.

एक्सवर पोस्ट करत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात, मतदार यादीत फक्त ५ महिन्यांत ८% वाढ झाली. काही बूथवर २०-५०% वाढ झाली. बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे नोंदवले. माध्यमांनी पडताळणी केलेल्या पत्त्याशिवाय हजारो मतदारांना उघड केले असल्याचा आरोप केला.

पुढे राहुल गांधी म्हणाले की, आणि निवडणूक आयोग? गप्प – की यात सहभागी, असा सवाल करत हे काही वेगळे दोष नाहीत. ही मत चोरी आहे. पण लपविणे ही कबुली आहे. म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतो अशी मागणीही यावेळी केली.

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्याच्या विधानसभा निवडणूकीवरून सातत्याने प्रश्नांचा भडिमार करत आहेत. मात्र त्यावर निवडणूक आयोगाकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आलेली नाहीत. मात्र काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर भाजपाकडून उत्तरे देण्याचा प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर त्यामुळे राहुल गांधी यांनी एका डिजीटल वृत्त वाहिनीच्या आधारे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदार यादीतील मतदारांच्या वाढीसंदर्भात आणि बुथवरील मतदानात २०-५० टक्के वाढीची आकडेवारी देत निवडणूक आयोगाच्या पारदर्शी निवडणूक प्रक्रियेतील दाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

Exit mobile version