Marathi e-Batmya

अनंत गाडगीळ यांचा सवाल, हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा भाजपाचा आदर?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ‘राजगृह’ या ऐतिहासिक निवासस्थानाला १४ एप्रिल रोजी येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेने राजगृहा समोरील पदपथावर अनेक फिरती शौचालय उभारली होती. स्थानिकांची या दिवसाबाबत तक्रारही नव्हती. तथापि आज १० दिवस उलटून गेले तरीही असंख्य अनुयायांनी वापरलेली ती फिरती शौचालये त्याच अवस्थेत असून मुंबई महापालिकेने अजून ती हटविलेलीही नाहीत. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल सुद्धा महापालिकेने घेतलेली नाही.

सदर राजगृहाच्या भोवताली होणाऱ्या अतिक्रमणाबाबत विधान परिषदेत काही वर्षांपूर्वी खुद्द अनंत गाडगीळ यांनी एक लक्षवेधी सूचना मांडली असता अनेक आमदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने तत्कालीन राज्यमंत्री रणजित पाटील यांनी “राजगृहाभोवतालच्या अर्धा किलोमीटर परिसरात सर्व प्रकारच्या अतिक्रमणाला बंदी घातल्याचे“ सभागृहात जाहीर केले होते, असेही गाडगीळ यांनी यानिमित्ताने निदर्शनास आणले आहे.

आज याच “राजगृहा”ला टॅक्सी, फेरीवाले, शाळांच्या अनधिकृत व्हॅन्स आदींनी घेरून टाकले आहे. अनंत गाडगीळ यांनी व्यक्तिशः तसेच अनेक नागरिकांनी ‘एफ ‘ विभागाचे उपआयुक्त यांच्याकडे परिसरातील समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही त्यांनी संपूर्णतः दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही गाडगीळ यांनी केला आहे. मुंबई महापालिकेत सत्तेत आलेल्या भा. ज. प. चा हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा आदर? असा परखड सवाल काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केला आहे.

Exit mobile version