Marathi e-Batmya

राज्य सरकारचा प्रस्ताव….पण रेल्वेने मंजूरी दिल्यास सर्वांसाठी लोकल सुरु

मुंबई: प्रतिनिधी

मागील अनेक दिवसांपासून मुंबई शहर व उपनगरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे उपनगरीय गाड्या कधी सुरू होणार याबाबत सातत्याने विचारणा करण्यात येत होती. तसेच कधी एकदा लोकल गाडी सुरू होते अशी अवस्था झाली होती. यावर आता लोकल रेल्वे सर्वच नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सर्वांनाच लोकलने प्रवास करण्यास रेल्वेने परवानगी द्यावी अशी मागणी करणारे पत्र रेल्वेला नुकतेच पाठविले.

कोरोनाचा प्रादुर्भावही रोखला जावा आणि सर्वांना लोकलने प्रवासही करता यावा यासाठी राज्य सरकारने वेळापत्रक निश्चित केले आहे. ते खालील प्रमाणे…..

सकाळी ७.३० वाजता सुटणाऱ्या पहिल्या लोकलने प्रवास करण्यास सर्वांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या आणि क्यु आर कोड असलेल्या व्यक्तींसाठी सकाळी ८.३० ते १०.३० ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.

सकाळी ११ ते ४.३० या कालावधीत कोणताही व्यक्ती प्रमाणित तिकीट आणि मासिक पास या आधारे प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

संध्याकाळी ५ ते ७.३०या कालावधीत पुन्हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे.

तर रात्रो ८ वाजल्यापासून शेवटची लोकलच्या कालावधीपर्यंत कोणताही व्यक्ती प्रवास करू शकणार आहे.

या नव्या वेळापत्रकानुसार रेल्वेने आपली सेवा सर्वांसाठी खुली करावी तसेच त्यादृष्टीने रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी विनंती राज्य सरकारने रेल्वेला केली.

Exit mobile version