Marathi e-Batmya

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपा सरकारच्या काळातच दलित, वंचित व महिलांवर अत्याचार वाढले

केंद्रात व राज्यात मनुवादी विचाराचे सरकार आल्यापासून दलित, मागास समाजावरील अत्याचारांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. महिला व मुलींवरील अत्याचार वाढले आहेत.ऑनर किलिंगच्या घटनाही वाढल्या आहेत. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही वेळेवर मिळत नाही. सामाजिक न्याय विभागाचा निधी दुसऱ्या योजनांसाठी वळवला जातो. सरकारकडे तक्रार करूनही त्यात सुधारणा होत नाही. भाजपा सरकार जाणीव पूर्वक दलित, वंचित, मागास व अल्पसंख्याक समाजाकडे दुर्लक्ष करत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे भाजपाचे प्रेम हे केवळ दिखावा आहे, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीला भेट देऊन खासदार वर्षा गायकवाड आंनी बाबासाहेबांच्या महान स्मृतींस अभिवादन केले. यावेळी आमदार डॉ. ज्योती गायकवाड, जिल्हा अध्यक्ष कचरू यादव, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, अनुसूचित जाती विभाग मुंबई अध्यक्ष सुभाष भालेराव, महिला अध्यक्ष ट्युलिप मिरिंडा, रोशन शहा, रहेनुमा सिद्दीकी, दीपक काळे आधी उपस्थित होते.

खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, भाजपा व आरएसएस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कधीच स्विकारले नाही. संविधान व लोकशाही पायदळी तुडवत भाजपा सरकार काम करत असून बाबासाहेबांचे संविधान बदलण्याचा त्यांचा अजेंडा आहे. संविधान हे आपल्या देशाचा आत्मा आहे, त्याचे रक्षण करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे व ते कोणतीही किंमत देऊन करू, असा निर्धार व्यक्त केला.

मुंबई काँग्रेसच्या वतीने देशभरातून आलेल्या बौध्द भिक्खू संघास चिवरदान व भोजनदान आणि भीम अनुयायींना अल्पोपहारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version