मुंबई महानगरपालिकेच्या ८० हजार ९५२ कोटींच्या अर्थसंकल्पात काहीही अर्थ नाही व कोणताही संकल्प नाही असा अर्थहिन अर्थसंकल्प आहे. मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशातून ९० हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी जमा केलेल्या होत्या, त्या ठेवी मोडून बीएमसीला दिवाळखोरीत ढकलण्याचा संकल्प या अर्थसंकल्पात केला असून मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
बीएमसीच्या बजेटवर प्रतिक्रिया देताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबईकरांना वाढत्या प्रदुषणापासून सुटका हवी आहे, यासाठी ठोस धोरण ठरवण्याची आवश्यकता असताना बजेटमध्ये त्यासाठी फारशी तरतूद केलेली नाही. बेस्ट सध्या प्रचंड अडचणीतून जात असून ती सक्षम करण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची गरज असताना केवळ १ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, यातून बेस्टच्या ताफ्यात नव्या बस खरेदी करणे, कामकाजात सुसुत्रता आणणे व प्रवाशांच्या सुविधेसाठी काहीही होणार नाही. बेस्टचे खाजगीकरण करण्यास यामुळे मोकळीकच मिळेल असे दिसते. सत्ताधारी भाजपा महायुतीने बजेटमध्ये बेस्टला वाऱ्यावर सोडल्याचेच दिसत असल्याची टीका केली.
वर्षा गायकवाड शेवटी बोलताना म्हणाले की, मुंबईतील मराठी शाळा बंद होत असताना त्यासाठी ठोस धोरण नाही, सत्ताधारी पक्षांच्या बगलबच्च्यांना महापालिकेच्या शाळा देण्याचा घाट घातला जात आहे, तो थोपवण्याचा संकल्प दिसत नाही. पिण्याचे पाणी, सार्वजनिक आरोग्य सेवा यासाठी निधीची तरतूद केली असली तरी भरीव नसून ती प्रत्यक्षात जाते कुठे, आहे खरा प्रश्न आहे. आम्ही महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन वस्तुस्थिती पाहिली असता अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून आला, मुंबईकरांना आरोग्य सुविधा देण्याकडे साफ दुर्लक्ष होत असून कंत्राटदारांचे भले करण्यासाठी त्यांचे खिसे भरण्यासाठीच पैसा खर्च होत आहे. मुंबईकर मात्र दर्जेदार वैद्यकीय उपचारापासून वंचितच राहणार असल्याचा आरोपही यावेळी केला.
