केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा दयावा लागला पण त्यांच्या राजीनाम्याने हा प्रश्न संपत नाही. देशातील तरुणांनी लढा पुकारला की एक नवा इतिहास निर्माण होतो, आज तेच घडले असून कोट्यवधी तरुणांच्या दबावापुढे अहंकारी हुकूमशाहला झुकावे लागले आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा अहंकाराचा पराभव आणि सत्य व संविधानाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली.
खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मोदी सरकारच्य १२ वर्षांच्या काळात तब्बल १५२ वेळा पेपरफुटीच्या घटना उघड झाल्या, पण सरकारने काहीही कारवाई केली नाही. सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत आहे. ही लढाई मोठी आहे आणि थांबणारही नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन देशभर आंदोलन छेडले. छात्रों की गुंज हे अभियान कोटा व डेहराडून येथे घेऊन मोदी सरकारला आव्हान दिले, संसदेत आवाज उठवला, पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून सरकारला जाब विचारला, अखेर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला आहे. या अहंकारी सरकारविरोधात काँग्रेस यापुढेही संघर्ष करत राहिल, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
आम्ही मुंबईकर…
वांद्रे येथे ‘आम्ही मुंबईकर’च्या वतीने राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, डॉ. ज्योती गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह हजारो मुंबईकर उपस्थित होते.
यावेळी खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असला तरी या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नीट पेपरफुटीमुळे २५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबातील लोकांना भरीव आर्थिक मदत करावी, त्यांचे पुनर्वसन करावे, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
