Marathi e-Batmya

वर्षा गायकवाड यांची मागणी, कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतच्या झोपडपट्यांची पाडकाम मोहीम रद्द करा

रेल्वे प्रशासनाने कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतच्या ३१५४ झोपड्यांचे पाडकाम करण्याची नोटीस २७ जानेवारी २०२६ रोजी दिली असून या नोटीसीमुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. १० फेब्रुवारी २०२६ ते १२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हे पाडकाम करण्यात येणार आहे. ही पाडकाम मोहीम रद्द करावी तसेच बाधित कुटुंबांसाठी कायमस्वरूपी पुनर्वसन योजना सुरू करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्र पाठवून केली आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवलेल्या पत्रात खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणतात की, ही वस्ती दोन दशकांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे आणि हजारो गरीब व गरजू कुटुंबांचे ते घर आहे. यापूर्वी या झोपड्या पाडण्याचे प्रयत्न न्यायालय आणि स्थानिक प्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे पुढे ढकलण्यात आले होते. तथापि, ही नवीन सूचना जारी केल्यामुळे रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती आणि अशांतता पसरली आहे. केवळ सहा दिवसांची सूचना देऊन ३००० हून अधिक झोपड्या पाडणे हे ना व्यवहार्य आहे ना माणुसकीचे आहे. अशा कृतीमुळे हजारो कुटुंबे रातोरात बेघर होतील आणि त्यांची आधीच नाजूक असलेली परिस्थिती आणखी बिकट होईल. हे गरिब कष्टकरी रहिवासी अत्यंत चिंतेत आहेत आणि वस्ती मधील वातावरण तणावपूर्ण आहे. या प्रश्नी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना गरीब आणि उपेक्षित नागरिकांच्या दयनीय परिस्थितीचा विचार करून, मानवी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही पत्राद्वारे केली.

Exit mobile version