Marathi e-Batmya

आदित्य ठाकरे यांचा उपरोधिक टोला, ….तो फोटो पाह्यला आणि मला हसूच आलं

पाच राज्यातील निवडणूकांमध्ये काँग्रेसच्या ताब्यातील तीन राज्ये भाजपाने हिसकावून घेतली आणि काँग्रेसला बऱ्याच वर्षानंतर फक्त दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यातील सत्ता पुन्हा मिळविता आली. विशेष म्हणजे भाजपाच्या विरोधात निर्माण झालेल्या इंडिया आघाडीच्या बाजूने वातावरण असतानाही भाजपाला मोठ्या प्रमाणात विजय मिळाला. त्यातच राज्यात काँग्रेस, भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष सोडले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी दोन पक्षात विभाजन झाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत आपल्याच पक्षाची सत्ता येणार असा दावा दोन्ही बाजूच्या पक्षांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर सत्ता भाजपाच्या आमदारांकडून आणि शिवसेना ठाकरे गटाकडून दररोज एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

त्यातच भाजपाच्या नेत्यांकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची राजकिय कोंडी करण्यासाठी पुन्हा एकदा स्व. सुशांतसिंग राजपूत यांची व्यवस्थापिका दिशा सालियन हीच्या हत्येप्रकरणी जबाबदार धरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक हिवाळी, पावसाळी आणि अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या काळात भाजपाच्या नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात राजकिय कोंडीचा भाग म्हणून पुन्हा एकदा सीबीआय तपास सुरु होणार, तसेच याप्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात येते.

मात्र काही केल्या आदित्य ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटावर दबाव निर्माम होत नसल्याने अधिवेशन संपले की ही मागणीही पुन्हा राजकारणाच्या धबडग्यात गायब होऊन जाते. पण आरोपांची पलिकडे काहीही होत नाही असे चित्रच सध्या राज्याच्या राजकारणात दिसून येत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या परदेशी असण्याच्या मुद्यावरून दिक्षा सालियन प्रकरणी चौकशी होणार असल्याने आदित्य ठाकरे हे भारत सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला.

त्याबाबत दुबईतील पर्यावरण आतंरराष्ट्रीय परिषदेस उपस्थित राहुन परतल्यानंतर आदित्य ठाकरे यांना या आरोपाबाबत विचारले असता म्हणाले की, भाजपाच्या काहीजणांना वाटते की त्यांच्या विरोधात राजकिय कट कारस्थान सुरु आहेत. त्यांच्या मनात आमच्याबद्दल भीती निर्माण झाली असल्यानेच सातत्याने काही ना काही आरोप ते करत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात असा टोलाही नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला.

तसेच मुंबईत पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मोहिम राबविल्याबाबत आणि स्वतः उपस्थित राहुन काही ठिकाणी सहभाग नोंदविल्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिंधीनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, मी परदेशातील पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषद संपवून नुकताच आलो. मात्र सकाळी सकाळी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा फोटो पाह्यला आणि मला हसू आल्याचा उपरोधिक टोला लगावत समुद्राच्या पाण्यात कोणी ट्रॅक्टर चालवंत का असा खोचक सवालही केला.

Exit mobile version