Marathi e-Batmya

पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस पुन्हा म्हणाले, दुसरी वेळ आल्यानंतर उर्वरित सांगेन

जवळपास तीन वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असल्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्याला दुजोरा देत तो शपथविधी शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावला. यासंदर्भात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, मी अर्धच बोललो पण दुसरी योग्य वेळ आल्यास उरलेलं जे काही आहे ते सांगेन असं विधान करत पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ माजवून दिली.

पुणे शहराचे खासदार गिरिष बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतील गौप्यस्फोटाबाबत विचारले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबाबतही विचारणा केली. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केले.
यावेळी बोलताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अजून अर्धच बोललो आहे. दुसरी योग्य वेळ आल्यास उरलेलं जे काही आहे, ते सांगेन असं विधान केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी एवढंच सांगेन की, मी जे काही बोललो आहे, ते सत्य बोललो आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले. पण मी काय-काय बोललो? ते तुम्ही शांतपणे बसून ऐका… म्हणजे तुम्हाला त्याची प्रत्येक कडी जोडता येईल. त्यावेळच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, त्यावेळी मी काय-काय बोललो आहे, तेही बघा. त्या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला दुसर्‍या पुराव्याचीदेखील गरज पडणार नाही असेही स्पष्ट केले.

खरं तर, देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आले होते. त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Exit mobile version