भारतामध्ये हवाईदलाला लागणाऱ्या सामुग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार केले जातात, त्याला वारेमाप प्रसिद्धीही दिली जाते पण प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे सदर सामुग्री हवाई दलास पुरविलीच जात नाही. ही बाब खुद्द भारताच्या हवाईदल प्रमुखांनीच दिल्लीतील एका कार्यक्रमात नुकतीच स्पष्ट्पणे मांडल्याचे काँग्रेस नेते अनंत गाडगीळ यांनी सांगितले.
अनंत गाडगीळ पुढे म्हणाले की, २०२१ साली एक सार्वजनिक उपक्रम व एक खासगी कंपनी सोबत लढाऊ विमान निर्मितीचा करार होऊनही गेल्या ४ वर्षात एकही विमान हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आलेले नाही. ही गंभीर बाब आता उघड झाली आहे. ऑपरेशन सिंदुरच्या यशाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारचे पितळ यामुळे उघडे पडले आहे अशी टीकाही यावेळी केली.
पुढे बोलताना अनंत गाडगीळ म्हणाले की, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी राफेल विमानाचा दर्जा व खरेदीचा व्यवहार याबाबत काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यावेळी भाजपाकडून राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत अशी त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर दरम्यान राफेल विमान पाडण्यात आले होते की नाही असा काँग्रेसतर्फे प्रश्न विचारला असताना, पाकिस्तानची किती विमान पाडली हे काँग्रेस का नाही विचारत असा उलट प्रश्न करत मूळ प्रश्नाला बगल दिली गेली होती. आजही मोदी सरकारतर्फे अजूनही याबाबत अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही. याउलट तिन्ही दलाचे प्रमुख अनिल चौहान यांनीच ही बाब आता मान्य केली. इतकेच नव्हे तर भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तर ५ राफेल पाडली गेल्याचे विधान केले आहे. मग आता अनिल चौहान व स्वामी कुणाची भाषा बोलत आहेत याचा भाजपा खुलासा करणार का ? असा प्रतिप्रश्नही यावेळी केला.
शेवटी बोलताना अनंत गाडगीळ म्हणाले की, अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीवर भारताच्या राफेल विमानाचे अवशेषही दाखविण्यात आले ते दृश्य खरे आहे की खोटे ( फेक ) याचाही खुलासा मोदी सरकारकडून अजूनही करण्यात आलेला नाही असे सांगत आता तर पाश्चिमात्य देशांनी राफेल विमानांबाबत फेरनिरीक्षण सुरु केल्याचे वृत्तही काही युरोप मधील वृतवाहन्यांनी दाखविल्याची चर्चा असल्याचेही यावेळी सांगितले.
