Marathi e-Batmya

अशोक चव्हाण यांची मागणी, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा

बिहार राज्याने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के केली आहे, बिहार भाजपानेही याला पाठिंबा दिला असून आता महाराष्ट्रात देखील बिहारप्रमाणे आरक्षण मर्यादा वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

अशोक चव्हाण म्हणाले, बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक कालच मंजूर केल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील ही मागणी होवू लागली आहे . जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही? असा सवालही केला.

पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावले उचलावीत, जेणेकरून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकेल. बिहारच्या या विधेयकाला तेथील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्याची आठवणही यावेळी करून दिली.

काँग्रेसने केलेल्या ठरावावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, देशात जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाने अगोदरच स्वीकारली असून, हैद्राबाद व नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत तसे ठरावही मंजूर करण्यात आले आहेत, याकडे लक्ष वेधून राज्य सरकारने याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणीही केली.

Exit mobile version