Marathi e-Batmya

अतुल लोंढे यांचा पलटवार, …वंचितचा समावेश होण्याच्या भीतीनेच…

देशाची लोकशाही अडचणीत आलेली आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धोक्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर देशपातळीवर इंडिया आघाडी होत आहे व राज्यात महाविकास आघाडी अभेद्य आहे. यात वंचित बहुजन आघाडी जोडली जाणार असल्याच्या भीतीने भाजपाला पोटशूळ उठला म्हणून दिशाभूल करणारी माहिती काही सुपारीबाज पत्रकार पसरवत आहेत, असा पलटवार काँग्रेस प्रदेशचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या इंडिया आघाडीतील समावेशासंदर्भात एका पत्रकाराने सोशल मीडियावर जाणीवपूर्वक धादांत खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवली. कोणीतरी पत्रकार येतो आणि मी अशी चर्चा ऐकली आहे असे सांगत सुटतो हे शक्य आहे का? आघाडी संदर्भातील महत्वाची चर्चा सुरु असताना असा कोणी पत्रकार तिथे बसू शकतो का? हा साधा प्रश्न आहे. पत्रकारासमोर आघाडी संदर्भातील महत्वाची चर्चा कोणी नेता करेल का? षडयंत्र रचणाऱ्या अशा पत्रकाराने सुपारीबाजपणा करायचे सोडून द्यावे. भाजपाच्या अशा कितीही सुपाऱ्या घेतल्या तरी भारतीय जनता पक्षाचा सपशेल पराभव होणार आहे. त्यामुळे अशा सुपाऱ्याने काहीही फरक पडणार नाही, असा इशाराही दिला.

Exit mobile version