काही दिवसांपूर्वी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये कार्यक्रम राबविण्याबाबतची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना लिहिले होते. तसेच याची अंमलबजावणी करावी अशी मागणीही यावेळी केली होती.
मात्र यावर राज्य सरकार म्हणून ना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या मागणीचे स्वागत केले नाही. परंतु हीच संकल्पना भाजपाने उचलून धरत राज्यात १५ ठिकाणी कार्यक्रम सादर करण्याचा निर्णय घेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तशी घोषणा केली.
रविंद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हणाले की, ‘वंदे मातरम’या राष्ट्रगानाला १५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमिताने भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी देशभर १५० ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत. राज्यात १५ ठिकाणी या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांत केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री सहभागी होणार असल्याचे सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत रविंद्र चव्हाण बोलत होते. प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी रविंद्र चव्हाण यांनी वंदे मातरम गीताचा इतिहास कथन केला. स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरमने सर्वसामान्य भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास दिलेली प्रेरणा लक्षात घेऊन या गीताची सार्ध शताब्दी साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम गायले जाणार आहे, असे ल्याचेही यावेळी सांगितले.
हे ही वाचाः आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना लिहिले पत्रह
राज्यात भाजपातर्फे होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती रविद्र चव्हाण यांनी दिली. नागपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अकोला येथील कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ठाणे येथील कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, रायगड येथील कार्यक्रमाला वन मंत्री गणेश नाईक, पुणे येथील कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, अहिल्यानगर येथील कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सातारा येथील कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, जळगाव येथील कार्यक्रमाला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, धुळे येथील कार्यक्रमाला पणन मंत्री जयकुमार रावल, छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, बहुजन मागास कल्याण मंत्री अतुल सावे, कुलाबा ( मुंबई ) येथील कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मानखुर्द येथील कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा, अंधेरी येथील कार्यक्रमाला मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, मालाड येथील कार्यक्रमाला आ. योगेश सागर, सायन येथील कार्यक्रमाला आ. प्रसाद लाड उपस्थित राहणार आहेत.
