Marathi e-Batmya

चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल, घरात बसून सरकार चालवणाऱ्यांना बोलण्याचा काय अधिकार?

ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवरून सरकार चालवले त्यांना रजेच्या मुख्यमंत्र्यांवर बोलण्याचा अधिकार आहे काय असा सवाल आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला अडीच वर्षे घरात बसून होते ते आज प्रश्न विचारतात हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार असा टोलाही बावनकुळे यांनी ठाकरे यांना लगावला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर सरकार चालवलं ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नागपुरात का गेले नाहीत? नांदेडला का गेले नाहीत? मुख्यमंत्री घरात का बसले असे विचारतात उद्धवजी जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा, ऑक्सिजनविना महाराष्ट्रात तडफडणारे रुग्ण आठवा आणि राज्यात हे सुरू असताना तुम्ही मात्र टेंडर वाटण्यात मश्गूल होतात. उद्धवजी, तुम्ही तर मृतदेहासाठी वापरायच्या बॅगध्येही कट कमिशन सोडलं नव्हतं. मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का? असा हल्लाबोल केला.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तुम्ही नांदेडला जाणार का? तर त्यावर ते म्हणतात मी कशाला जाऊ? माझा पक्ष चोरलाय, माझं पद गेलं. म्हणजे पदावर असताना घरी बसायचं. पद गेल्यावरही घरात बसून पत्रकार परिषद घ्यायची आणि स्वतः काही करायचं नाही, तुमचे सरकार असताना कोविड काळात जे घोटाळे झाले त्याबद्दल कधी तरी बोलणार की नाही? हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार अशी टीकाही केली.

Exit mobile version